Nagar | वाळवणे- रूईछत्रपती रस्त्याची दुरवस्था, एक वर्षापूर्वी मंजूर निधी गेला कुठे; ग्रामस्थांचा सवाल

पारनेर, (प्रतिनिधी)- तालुक्यातील वाळवणे-रूईछत्रपती रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली असून, मोठ मोठे खड्डे पडले आहेत. पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना ये- जा करताना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. या समस्येकडे लक्ष द्यायला ना पुढाऱ्यांना वेळ आहे ना बांधकाम विभागाला.
येथील नेतेमंडळी फक्त मतदानापुरताच आमचा वापर करून घेत असल्याचा आरोपही नागरिकांमधून केला जात आहे. एक वर्षापूर्वी पठारे वस्ती ते वाळवणे रस्त्यासाठी सुमारे ६० लाख निधी मंजूर असल्याचे खासदार नीलेश लंके यांनी जाहीर केले मात्र एक वर्षाचा कालावधी उलटूनही रस्त्याचे काम सुरू होतं नसल्याने हा निधी गेला कुठे, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
रूईछत्रपती येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे उपकेंद्र आहे. या आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी नागरिक, वृद्ध, शाळेतील विद्यार्थ्यांना या रस्त्यावरून दररोज ये-जा करावी लागते.
यासह शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतीमाल मुख्य बाजारपेठ असलेल्या सुपा, पारनेर, नगर, पुणे येथे घेऊन जाण्यासाठी तसेच दुग्ध व्यावसायिक, कंपनी कामगार, शालेय विद्यार्थ्यांची या रस्त्यावर म़ोठ्या प्रमाणात वर्दळ असते. रस्त्यावर खड्डे पडले असल्यामुळे वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, मणके, पाठ, कंबरदुखी असे आजार उद्भवू लागले आहेत.
मध्यंतरी झालेल्या पावसामुळे पठारे वस्ती ते रूईछत्रपती फाटा या एक किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
या रस्त्यावर पायी चालणे देखील अवघड झाले आहे. खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे अनेक दुचाकीस्वार याठिकाणी घसरून पडले आहेत. अनेक छोटे-मोठे अपघात देखील याठिकाणी झाले आहेत. रस्त्यावर पडलेले खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी नागरिकांसह प्रवाशांमधून केली जात आहे.
विधानसभा आचारसंहितेपूर्वी कामास प्रारंभ करा
लोकसभा निवडणुकीपूर्वी सुमारे एक वर्षापूर्वी ६० लाख रुपये निधी मंजूर असल्याचे खासदार लंके यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. सुमारे एक वर्षाचा कालावधी उलटूनही अद्याप रस्त्याचे काम सुरू झाले नसल्याने किमान विधानसभा निवडणुक आचारसंहितेपूर्वी कामास प्रारंभ करावा, अशी मागणी नागरिकांसह प्रवाशांमधून केली जात आहे.





