Vaishnavi Hagawane Case : हगवणेंच्या वकिलाचा खळबळजनक दावा; म्हणाले वैष्णवीची प्रवृत्ती..’
पुणे : मागच्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणात (Vaishnavi Hagawane Case) अटक करण्यात आलेल्या आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने पती, सासू आणि नणंद यांना 1 दिवसाची, तर सासरा आणि दिर यांना पुन्हा 3 दिवसांची म्हणजे 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान कोर्टात युक्तिवाद करताना हगवणे कुटुंबाच्या वकिलाने वैष्णवीच्या चारित्र्यावर (Vaishnavi Hagawane Case) संशय व्यक्त करत एक खळबळजनक दावा केला आहे.
काय केला खळबळजनक दावा?
हगवणेंच्या वकिलाने युक्तिवादादरम्यान वैष्णवीचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला. “वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते, ते आम्ही पकडले होते. त्याची माहिती आम्हाला हवी आहे. आम्हाला न्याय हवा आहे,”तसेच वैश्नवीची टेंडंसी सुसाईड करण्याची होती. तिने २ वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला. एकदा रॅट पॉयझन खाऊन आणि एकदा गाडीतुन उडी मारून.
निलेश चव्हाणच्या बाबतीत काय म्हणाले?
निलेश चव्हाणला या प्रकरणात आरोपी करणे चुकीचे आहे. निलेश चव्हाणने बाळाला सांभाळलं. पण उलट हेळसांड केली म्हणून निलेश चव्हाणवरच गुन्हा दाखल केला आहे. निलेश चव्हाण हा हगवणेंचा नातेवाईक नाही. तो दोषी असेल तर त्याला फाशी द्या. पण त्याला या प्रकरणात आरोपी करणेच चुकीचे आहे”, असे वकील म्हणाले आहेत.
सरकारी वकिलांनी काय केला युक्तिवाद?
सरकारी वकिलाने युक्तिवाद करताना म्हटलं की, “आरोपींचे मोबाईल सापडलेले नाहीत. आरोपींचे मोबाईल तपासायचे आहेत. कदाचित मोबाईलमध्ये आणखी काही व्हिडिओ असण्याची शक्यता आहे. आरोपींनी वैष्णवीला मारहाण केली ती हत्यारे आणि रॉड हस्तगत करायचे आहेत. आत्तापर्यंत योग्य दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे” असे म्हंटले. फिर्यादींच्या वतीने ॲड. शिवम निंबाळकर यांनी काम पाहिले. आरोपींच्या वतीने ॲड. विपुल दुशिंग यांनी युक्तिवाद केला.
काय आहे वैष्णवी हगवणे प्रकरण ? (Vaishnavi Hagawane Case)
वैष्णवी हगवणे या राष्ट्रवादीचे मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांच्या सून होत्या. 16 मे रोजी वैष्णवी हगवणे यांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं जात होतं. मात्र त्यांच्या शरीरावर व्रण आढळल्यानं तिच्या पालकांनी वैष्णवीची हत्या झाल्याचा आरोप केला.वैष्णवी हगवणे आणि शशांक हगवणे यांचा 28 एप्रिल 2023 रोजी प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर सासरच्या लोकांकडून तिला वारंवार त्रास दिला जात होता. वैष्णवीचे वडिल अनिल कस्पटे यांनी लग्नाच्या वेळी 51 तोळे सोने, फॉर्च्युनर गाडी, चांदीची भांडी आणि सासरच्यांनी सूचवलेल्या कार्यालयात लग्न लावून दिले होते. मात्र, तिचे सासू, सासरे आणि नवरा यांनी लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच तिच्याशी भांडणं करायला सुरुवात केली.लग्नाच्या चार ते पाच महिन्यानंतर वैष्णवीच्या सासू लता हगवणे यांनी चांदीच्या भांड्यांची मागणी केली. ती दिली नाहीत म्हणून तिला त्रास देणे सुरू होते. तसेच वैष्णवी गरोदर असताना तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करण्यात आली.
यानंतर 27 नोव्हेंबर 2023 मध्ये वैष्णवीनं आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारानंतर ती पुन्हा सासरी रहायला गेली होती. मात्र, त्यानंतर 15 दिवसांनी वैष्णवीचे पती शशांक हगवणेंनी जमीन खरेदी करण्यासाठी 2 कोटी रुपयांची मागणी केली. ही रक्कम देऊ न शकल्याने पुन्हा वैष्णवीला त्रास देत तुला फुकट पोसणार आहे का तुझ्या खानदानाचा काटा काढतो, अशी धमकी दिली. यानंतर तिला मारहाण करून पुन्हा माहेरी सोडण्यात आले. 5 मे 2025 ला वैष्णवी तिच्या चुलत भावाच्या लग्नासाठी माहेरी आली होती तेव्हा जावयाला पोशाख आणि अर्धा तोळ्याची अंगठी दिली. यातला पोशाख फेकून ते निघून गेले आणि वैष्णवीला माहेरी थांबू द्यायलाही त्यांनी नकार दिला. 16 मे रोजी वैष्णवीच्या नातलगांना फोन करून तिला माहेरी न्यायला सांगा असे शशांक यांनी कळवले. तसेच संध्याकाळी याच नातलगांना वैष्णवीनं आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी वैष्णवीचे सासरे, सासू, नंणद, नवरा आणि दीर यांना अटक केली आहे.





