US Iran Conflict: अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाचे पडसाद आता जागतिक अर्थव्यवस्थेवर उमटू लागले आहेत. भारतासारख्या देशासाठी हे विशेष चिंताजनक आहे, कारण आपली ८८ टक्के कच्च्या तेलाची गरज आयातीतून भागवली जाते. युद्ध लांबले तर महागाई, शेअर बाजार, रुपया आणि व्यापार या सर्वांवर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाली तर? फारसच्या आखाताला अरबी समुद्राशी जोडणारी होर्मुझ सामुद्रधुनी केवळ ३३ किलोमीटर रुंद आहे. जगातील मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल याच मार्गाने वाहतूक होते. फिच समूहाच्या BMI या संस्थेने इशारा दिला आहे की ही सामुद्रधुनी बंद झाल्यास इंधनाच्या किमती झपाट्याने वाढतील आणि भारताच्या GDP मध्ये ०.५ टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. १ मार्च रोजी होर्मुझमधून केवळ ५ तेलटँकर गेले, जेथे युद्धाच्या आधी दररोज सुमारे ६० टँकर जात होते. ही आकडेवारी ‘कमोडिटीज अॅट सी’च्या आकडेवारीवर आधारित असून S&P ग्लोबल एनर्जीने हा इशारा दिला आहे. टँकरची संख्या एक आठवडा इतकीच राहिली तर ते ऐतिहासिक मानले जाईल आणि त्यापुढे गेल्यास तेल बाजारात मोठी उलथापालथ होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. इराणच्या धमकीनंतर अनेक विमा कंपन्यांनी जहाजांना विमा देणे बंद केले असून त्याचा थेट परिणाम तेलटँकरांच्या वाहतुकीवर झाला आहे. महागाई वाढण्याची भीती – ICICI बँक ग्लोबल मार्केटच्या अहवालानुसार, कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १० डॉलरने वाढल्या तर किरकोळ महागाईत ०.५० ते ०.६० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. याचा अर्थ असा की तेल जितके महाग, तितकी रोजच्या वस्तूंची महागाई जास्त. मात्र तेल प्रति बॅरल १०० डॉलरपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आर्थिक विकासावर फार मोठा परिणाम होणार नाही, असेही बँकेने म्हटले आहे. २००५ ते २०१४ दरम्यान तेलाची सरासरी किंमत ८२ डॉलर असताना महागाई सरासरी ८.७ टक्के होती, तर २०१५ ते २०२५ दरम्यान किंमत ६९ डॉलरवर आली तेव्हा महागाई ५ टक्क्यांपर्यंत खाली आली होती. यावरून तेल आणि महागाईचा थेट संबंध स्पष्ट होतो. कारण इंधणाचे दर वाढले की साहजीकच दळणवळण आणि त्यामुळे वस्तूंच्या किंमती वाढतात. हेही वाचा – वैद्यकीय भत्ता 1 हजारांवरून 20 हजार रुपये होणार? जाणून घ्या कर्मचाऱ्यांच्या 8 प्रमुख मागण्या शेअर बाजारावर काय परिणाम? भारतीय शेअर बाजाराच्या निर्देशांकांमध्ये सोमवारी सुमारे १.२५ टक्क्यांची मोठी घसरण झाली. ब्रोकरेज कंपनी MK ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या मते, हा तणाव कायम राहिल्यास निफ्टी २४,५०० ते २५,००० पर्यंत खाली येऊ शकतो. युद्ध एक ते दोन आठवड्यांपेक्षा जास्त लांबले तर बाजार आणखी खाली जाऊ शकतो. शेअर बाजाराचे मूल्यमापन आधीच जास्त आहे आणि परदेशी गुंतवणूकदार पैसे काढू लागल्यास रुपयावरही दबाव येऊ शकतो. मात्र एक आठवड्यात परिस्थिती सामान्य झाल्यास बाजार लवकर सावरू शकतो, असेही तज्ज्ञांचे मत आहे. भारत-इराण व्यापारावर काय परिणाम होणार? भारत इराणला बासमती तांदूळ, कॉफी, चहा, खाद्यतेल, मशीनचे सुटे भाग, रसायने आणि काही औषधे निर्यात करतो. २०२४ मध्ये या निर्यातीचे एकूण मूल्य सुमारे १.२५ अब्ज डॉलर होते. दुसरीकडे भारत इराणमधून सेंद्रिय रसायने, पिस्ता, बदाम यांसारखे सुकामेवा आणि काही विशेष वस्तू आयात करतो. या आयाताचे मूल्य सुमारे १ अब्ज डॉलर आहे. इराणवरील आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे इंधन आयात आधीच जवळपास बंद आहे, त्यामुळे आयातीचा मोठा भाग रसायने आणि खाद्य पदार्थांपुरताच मर्यादित आहे. युद्ध लांबल्यास हा व्यापारही विस्कळीत होण्याची भीती आहे. हेही वाचा – इराणमधील 9000 भारतीयांना घरातच राहण्याचा सल्ला; भारतीय दूतावासाकडून नवी अॅडव्हायझरी दरम्यान, युद्ध लवकर थांबले तर भारतावर मर्यादित परिणाम होतील, परंतु संघर्ष लांबला आणि होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाली तर मात्र महागाई, रुपया, शेअर बाजार आणि व्यापार या सर्व आघाड्यांवर भारताला मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. दरम्यान, आज मंगळवारी होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्या असल्याचेही वृत्त समोर आले आहे. त्यामुळे हे संकट अधिक गडद होणार आहे.