Uddhav Thackrey | Sanjay Shirsat | Ravi Rana – शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंगळवारी लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर १५ दिवसांत मोदी सरकारमध्ये सामील होतील असा दावा अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी केला आहे. रविवारी पत्रकारांशी बोलताना आमदार रवि राणा म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे आणि नेते संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल काय बोलतात ते मला माहीत आहे. परंतु मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की मोदीजी पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर १५ दिवसांनी उद्धव ठाकरे मोदी सरकारमध्ये आणि मोदीजींसोबत दिसतील, कारण येणारा काळ मोदीजींचा आहे आणि उद्धव ठाकरेंना ते माहीत आहे’, असा दावा त्यांनी केला. त्यावरून आता चर्चांना उधाण आलेलं असतानाच आज शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलं आहे. ‘उद्धव ठाकरे यांना एनडीएत घ्यायचं की नाही हे वेळ सांगेल. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एवढी टोकाची टीका केल्यानंतर उद्धव ठाकरे येतील असं वाटत नाही’, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी संजय शिरसाट यांनी उद्याच्या होऊ घातलेल्या निकालावरही भाष्य केलं. ‘आता धाकधूक वाढू लागली आहे. पण ही धाकधूक आमची नाही, तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांची आहे. आमचे उमेदवार निश्चिंत आहेत’, असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, रवि राणा यांच्या पत्नी व अमरावतीचे विद्यमान खासदार नवनीत राणा यंदा त्या लोकसभा मतदार संघात भाजपच्या उमेदवार आहेत. २०१९ मध्ये नवनीत राणा यांनी अमरावतीमधून अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक जिंकली.