उद्धव ठाकरेंच्या बारसू येथील सभेला परवानगी नाकारली; वातावरण तापण्याची शक्यता…

मुंबई – बारसू प्रकल्पावरुन राजकारण तापलेले असताना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारसूला जाणार असल्याचे घोषित केले होते. मात्र आता त्यांच्या याठिकाणी होणाऱ्या सभेला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू- सोलगाव येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पास स्थानिकांचा तीव्र विरोध होत आहे.
मुंबईत झालेल्या वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरेंनी सरकारला बारसूवरुन इशारा दिला होता. बारसू पाकव्याप्त काश्मीर नाही. तिथे मी 6 तारखेला जाऊन बोलणार आहे. मी तेव्हा बारसूसाठी पत्र दिले होते. मात्र, असा अत्याचार करून प्रकल्प उभारा म्हणून पत्र दिले नव्हते, असा घणाघाती हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी शिंदे-भाजप सरकारवर केला होता. त्यामुळे आता त्यांच्या सभेला परवानगी नाकारल्याने वातावरण तापण्याची शक्यता आहे.
आंदोलकांना भेटण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा 6 मे ला बारसूचा दौरा करणार आहेत. यावेळी ठाकरे गटाने रानतळे येथे सभेचे नियोजन केले होते. प्रशासनाने रिफायनरी विरोधकांना भेटण्याची परवानगी दिली आहे. मात्र सभा घेता येणार नाही, असे ठाकरे गटाला स्पष्टपणे सांगितले आहे. दरम्यान, बारसू रिफायनरीच्या समर्थनार्थ महायुतीचा प्रत्युत्तर मोर्चा रत्नागिरी हेलिपॅडपासून सुरू होणार असल्याची सांगितले जात आहे.
पवार-ठाकरेंच्या परस्परविरोधी भूमिका
रत्नागिरीतल्या बारसू रिफायनगरी प्रकल्पावरून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी परस्परविरोधी भूमिका घेतल्या आहेत. त्यामुळे राजकीय गोटात महाविकास आघाडीच्या फुटीची चर्चा सुरू झाली आहे. शरद पवारांनी बारसू प्रकल्प करताना लोकांना विश्वासात घेण्याचे आवाहन केले. मात्र, ठाकरे गटाने या प्रकल्पाला तीव्र विरोध केला आहे.





