Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं बंडखोरीविरोधात पहिलं पाऊल! धाराशिव जिल्ह्यातील बड्या नेत्यांना ‘मातोश्री’वर बोलावलं
Uddhav Thackeray : या खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबतचे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिल्याची माहितीही समोर येत आहे. या यादीत धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा देखील समावेश आहे.

Uddhav Thackeray : चार वर्षानंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. त्यांच्या पक्षातील नऊपैकी सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला असून लवकरच हा गट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना (शिंदे गट) मध्ये विलिन होणार असल्याची चर्चा आहे.
त्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. या खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबतचे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिल्याची माहितीही समोर येत आहे. या यादीत धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा देखील समावेश आहे.
ओमराजे यांनी जरी आपण 20 जूननंतर भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले असले तरी ते शिंदे गटात जातील अशी शक्यता निर्माण झाली आहे. या अनुषंगाने आता उद्धव ठाकरे यांनी देखील हालचाली सुरू केल्या असून, मातोश्रीवर धाराशिव जिल्ह्यातील बड्या नेत्यांना बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.
धाराशिवमध्ये पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी बैठकीत चर्चा करून आखणी केली जाणार आहे. यामुळेच स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक मातोश्रीवर बोलावण्यात आली आहे. ही बैठक पक्षाच्या वर्धापन दिनानंतर होणार असल्याचे समजते. या बैठकीत स्थानिक नेत्यांसोबत उद्धव ठाकरे यांच्याकडून संवाद साधला जाणार आहे.
काल ठाकरे गटाने नवी दिल्लीत बोलावलेल्या पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीला सहा खासदारांनी दांडी मारल्याने त्यांच्या भूमिकेबाबत तर्कवितर्क अधिक तीव्र झाले आहेत. या खासदारांमध्ये संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील आणि नागेश पाटील आष्टीकर आणि ओमराजे निंबाळकर या खासदारांचा समावेश आहे. ओमराजे शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरू झाल्यापासून त्यांच्या मतदार संघातील नागरिकांकडून निषेध नोंदवण्यात येत आहे. ओमराजे यांचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावत फॅालोअर्स असून त्यांची संख्या आता घटली आहे.
एकीकडे, गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये शिवसेना शिंदे गटाचा 60 वा वर्धापन दिन मोठ्या थाटात साजरा केला जाणार असून राज्यभरातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते मेळाव्यासाठी दाखल होणार आहेत. तर दुसरीकडे ठाकरे गटाचा वर्धापन दिन कार्यक्रम सायन येथील षण्मुखानंद सभागृहात होणार असून त्याचीही जोरदार तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही वर्धापन दिनाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.
हेही वाचा : Times Square Firing: अमेरिकेतील टाइम्स स्क्वेअरमध्ये गोळीबार ; गोंधळाचे वातावरण ; पहा व्हिडिओ






