मुंबई – महाविकास आघाडीचा आज मुंबईत महामोर्चा काढण्यात असून त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आमदार-खासदारांकडून शिवाजी महाराजांविषयीची वादग्रस्त वक्तव्य, राज्यपालांची विधानं आणि राज्यातून बाहेर जाणारे उद्योग या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. आणि या मोर्चातून सरकारचा निषेध करण्यात आला आहे. सकाळी 10.30 वाजता या मोर्चाला सुरुवात झाली असून, भायखळा ते आझाद मैदान असा महामोर्चाचा मार्ग होता.
शिवाय, याठिकाणी सभेचं देखील आयोजन करण्यात आलं असून, महाविकास आघाडीतील नेतेमंडळी सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटावर आक्रमक टीका केल्याचं यावेळी पाहायला मिळालं. या हल्लाबोल मोर्चामध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली असून, आपल्या भाषणातून सर्वांचा समाचार घेतला आहे.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, “बऱ्याच वर्षांनंतर एवढा मोठा मोर्चा देशाने पाहिला असेल. घोषणा केल्यानंतर मला विचारलं की तुम्ही इतके चालणार का..? मी म्हटलं मी एकटा नाही तर माझ्यासह लाखो महाराष्ट्र प्रेमी महाराष्ट्रद्रोह्यांच्या छाताडावर चालणार आहेत. हे चालणं हे एक प्रतिकात्मक आहे. आजपर्यंत ज्यांनी आपल्याला डिवचलं त्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळ आहे. असं ते म्हणाले.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर देखील टीका केल्याचं दिसून आलं. उद्धव ठाकरे म्हणाले…, “आता सर्वपक्ष एकवटले आहेत. फक्त महाराष्ट्रद्रोही या मोर्चात नाही आहेत. स्वत:ला बाळासाहेबांच्या विचार पुढे घेऊन जाणारे तोतये समजतात. पण, त्यांचे विचार दिल्लीशी लाचारी करणारे नव्हते.
खुर्ची गेली तर बेहत्तर पण महाराष्ट्राच्या स्वाभीमान आणि अस्मितेशी तडजोड करणार नाही. असं कोणी करण्याचा प्रयत्न करेन, त्याला गुडघ्यावर खाली झुकवल्याशिवाय राहणार नाही, कारण ही शिवसेना आहे. असे म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे.