प्रभात वृत्तसेवा पुणे – शिवसेना-भारतीय जनता पक्ष युती होती त्यावेळी आम्ही प्रखर हिंदुत्ववादी आणि आता भारतीय जनता पक्षाला सोडले म्हणून आम्ही हिंदूत्व सोडले का ? मुस्मिमांना खुश करण्यासाठी भाजपने सौगाद-ए-मोदी चे वाटप केले. त्यांनी मुस्मिमांसाठी काही केले तर ते अमर प्रेम आणि इतरांनी मुस्लिमांची बाजू घेतली तर ते लव्ह जिहाद, अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजच्या नेत्यांचा समाचार घेतला.पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले की, युती सोडून काँग्रेसबरोबर गेलो म्हणून शिवसेनेने हिंदूत्व सोडले, अशी ओरड भाजपकडून केली जाते. मग तुम्ही चंद्राबाबू, नितिशकुमार यांच्याबरोबर गेला ते दोघे हिंदुत्ववादी आहेत का? असा प्रश्न उध्दव ठाकरे यांनी उपस्थित केला. राष्ट्रीय स्वयंसेव संघ सुरू करून तो वाढविताना ज्यांनी खस्ता खाल्ल्या, कष्ट घेतले त्या कष्टाला आज काही विषारी फळे लागली हेच तुमचे शंभर वर्षाचे फलित आहे का? असा प्रश्नही मोहन भागवत यांना विचारायचा आहे? माझे त्यांच्याविषयी काही आक्षेप नाही. पण, तुमचे ते अमर प्रेम आणि आमचे ते लव्ह जिहाद कसे? हे सांगायचे आहे. उध्दव ठाकरे म्हणाले की, आपल्या देशाला पंतप्रधान, गृहमंत्री आणि मंत्रीमंडळाची गरज आहे. कारण, आत्ता जे बसलेत ते पक्षाचे मंत्री बसलेत, देशाचे नाही. आपला देश खूप चांगला आणि सुंदर आहे. संस्कृती चांगली आहे. त्या देशाला थोतांड कारून नासवून टाकले. देशाचे हे नरक बनवायला चालले आहेत. हे देशाला हुकुमशाहीच्या दिशेने घेऊन चालले आहे, अशी टीकाही ठाकरे यांनी केंद्र व राज्य सरकारवर केली. मुख्यमंत्री फडणवीस हतबल.. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार चालविताना हतबल झाले आहेत. कशासाठी हतबल आहेत याची कल्पना नाही, त्यांच्याकडे पाशवी बहुमत आहे. अनेक, वर्षांनंतर एवढे मोठे संख्याबळ असलेले त्यांचे सरकार सत्तेवर आले आहे. केंद्र सरकार त्यांच्या पाठीशी आहे. एवढे बहुमत असलेले मुख्यमंत्री हतबलतेने का वागतात, हे मला समजत नाही, असेही ठाकरे म्हणाले.