मुंबई : मतदारयादीतील कथित घोळावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या सादरीकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ठाकरे शैलीत जोरदार प्रत्युत्तर दिले. विशेष म्हणजे, भाजप नेते आशिष शेलार यांच्या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे यांनी ‘अभिनंदन’ करीत त्यांच्या ‘हिम्मतीचे कौतुक’ केले, पण त्याचवेळी शेलारांच्या विधानांमुळे मुख्यमंत्री फडणवीस ‘पप्पू’ ठरल्याचा बोचरा टोला लगावला. शेलारांच्या विधानांमुळे मुख्यमंत्री फडणवीस ‘पप्पू’ ठरले शनिवारी महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईत मतदारयादी घोळाविरोधात मोर्चा काढण्यात आला. त्यावर प्रत्युत्तर देताना रविवारी भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन मविआ आणि मनसे नेते राज ठाकरे यांच्यावर ‘तुष्टीकरणाचा राजकारण’ करीत मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजातील दुबार मतदारांचा मुद्दा उपस्थित केल्याचा आरोप केला. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत शेलार यांचे ‘अभिनंदन’ करीत म्हटले, “मी प्रथम आशिष शेलार यांचे अभिनंदन करतो. शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पप्पू ठरवलं आहे. त्यांनी मतदारयादीत घोळ असल्याचं सिद्ध केलं. आम्ही वारंवार घोळ असल्याचं सांगत होतो, पण फडणवीसांनी नाकारलं होतं. आता शेलार यांनीच घोळ मान्य केला. हिम्मत केली त्यांनी – अमित शहा, पंतप्रधान मोदी ते फडणवीस यांना खोटं ठरवलं. शेलारांचं काय बिनसलं माहीत नाही, पण कौतुक करतो! उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “आम्ही मतदारयादीत घोळ आहे असं सांगितलं, पण अमुक नावं वगळा, तमुक नावं वगळा असं म्हटलं नाही. शेलार यांची उठबस त्या लोकांमध्ये आहे, म्हणून त्यांना ती नावं सापडली. आम्ही या लोकांमध्ये जास्त असतो, म्हणून आम्हाला ही नावं मिळाली!” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. शिवसेना शाखांमध्ये मतदार ओळख केंद्र सुरू होणार मतदारयादी घोळ प्रकरणी ठोस पावलं उचलताना उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली की, शिवसेना (उबाठा) च्या सर्व शाखांमध्ये ‘मतदार ओळख केंद्र’ सुरू करण्यात येणार आहेत. या केंद्रांवर मतदारांना आपले नाव मतदारयादीत आहे का, घराच्या पत्त्यावर इतर कोणते मतदार नोंदणीकृत आहेत का, याची तपासणी करता येणार आहे. ठाकरे म्हणाले, “निवडणूक आयोगाचे सक्षम ॲप आहे, पण हे ॲप भलतेच लोक चालवत असल्याची शंका आहे. माझंही नाव यादीतून वगळण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे सर्व मतदारांनी आपलं नाव यादीत आहे का, हे तपासावं.” Gen-Z ला मतदानापासून वंचित ठेवण्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी मतदारयादीची कट-ऑफ तारीख १ जुलै २०२५ ठेवण्यात आल्यावरून सरकारवर टीका केली. ते म्हणाले, “या तारखेमुळे १८ वर्ष पूर्ण झालेल्या नवमतदारांना (Gen-Z) या निवडणुकीत मतदान करता येणार नाही. सरकार Gen-Z ला घाबरतंय का? तसेच नव्या मतदारांनी आपली विनंती पत्रे शिवसेना शाखेत द्यावीत, जेणेकरून किती जणांना मतदानापासून वंचित ठेवलं जातंय, याची माहिती सरकारला देता येईल.” मतदारयादी घोळ प्रकरणी सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप आणि आंदोलनांमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, शिवसेना (उबाठा) च्या शाखास्तरीय मोहिमेमुळे हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.