तुळशीबाग गणेशोत्सव मंडळाचा सामाजिक उपक्रम: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पाठबळ

पुणे: गणेशोत्सव कार्यकर्त्यांवरील टीका चुकीची असून, त्यांच्या रचनात्मक कार्याला समाजाने पाठिंबा द्यावा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग गणेशोत्सव मंडळाने समाजातील वंचित विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कार्याचे कौतुक करत, त्यांच्या उपक्रमांना शासन नेहमीच खंबीरपणे साथ देईल, असे त्यांनी सांगितले.
तुळशीबाग मंडळाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त, भोई प्रतिष्ठानच्या पुण्यजागर प्रकल्पांतर्गत नांदेड जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शुल्काचा धनादेश चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी मंडळाचे स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, अध्यक्ष विकास पवार, उपाध्यक्ष विनायक कदम, कोषाध्यक्ष नितीन पंडित, भोई प्रतिष्ठानच्या पुण्यजागर प्रकल्पाच्या समन्वयक गीतांजली देगावकर, पल्लवी वाघ, दिनेश शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
मंडळाचे कोषाध्यक्ष नितीन पंडित म्हणाले, “बळीराजावर आत्महत्येची वेळ येणे हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यासाठी दुर्दैवी आहे. या मुलांच्या शिक्षणासाठी महागणपतीचा आशीर्वाद कायम राहील.” हा कार्यक्रम पाटील यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला असून, यात मंडळाचे विश्वस्त साईनाथ डोंगरे, चकोर सुबंध, प्रतीक इप्ते, गणेश रामलिंग, अभिजीत वाळके आणि सौरभ कदम यांनी पुढाकार घेतला. या उपक्रमाने तुळशीबाग मंडळाने सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला असून, इतरांनीही अशा कार्यात सहभागी होण्याची गरज आहे.





