TOP 10 News : 1. लाडक्या बहिणींच्या खात्यात 3 हजार रुपये जमा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाभार्थी महिलांना तब्बल दोन महिन्याचे पैसे खात्यावर जमा झाले आहेत. लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात गुरुवारी मार्च महिन्याचा हप्ता जमा करण्यात आला होता. तर शुक्रवारी लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचे १५०० रुपये जमा झाले आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन दिवसात ३००० रुपये जमा झालेत. यामुळे फेब्रुवारीपासून पैशांच्या प्रतिक्षेत असलेल्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. फेब्रुवारीच्या हप्त्याची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यात २४ मार्चला जमा करण्यात आली होती. त्यानंतर लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या रकमेसाठी वाट पाहत होते. अखेर राज्य सरकारकडून १४ आणि १५ मे रोजी अनुक्रमे मार्च आणि लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम वर्ग करण्यात आले आहेत. Ladki bahin Yojana2. मनोजकुमार शर्मा पाहणार मुंबईची कायदा-सुव्यस्था Ladki Bahin Yojana राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात ‘ट्वेल्थ फेल’ चित्रपटातून ज्यांचा प्रेरणादायी प्रवास समोर आला ते म्हणजे आयपीएस अधिकारी मनोजकुमार शर्मा… यांच्यावर गृहविभागाने मुंबईच्या कायदा व सुव्यवस्थेची सह आयुक्त म्हणून जबाबदारी सोपवली आहे. मनोजकुमार शर्मा हे आता मुंबईचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे नवे सहपोलीस आयुक्त असणार आहेत. याशिवाय IPS तेजस्वी सातपुते यांची पुण्याच्या गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र खरात प्रकरणातील एसआयटीचा तपास सातपुते यांच्याकडेच राहणार असल्याची माहिती आहे. तर अनिल कुंभारे मुंबई गुन्हे शाखेचे नवे सहपोलीस आयुक्त, सुवेझ हक यांची मुंबई पोलिसांच्या प्रशासन विभागाच्या सहपोलीस आयुक्तपदी नियुक्ती, त्याचबरोबर राजेश प्रधान मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे नवे सहपोलीस आयुक्त असणार आहेत. 3. “मराठ्यांचं वाटोळ करण्याचं काम फडणवीसांनी केलं” मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “सातारा संस्थानचा जीआर एक महिन्यात काढू म्हटले होते, पण त्याला आठ महिने उलटून गेले. राज्यातील सर्व गुन्हे मागे घेऊ म्हटले ते अद्याप का घेतले नाहीत? ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र सापडले त्यांना व्हॅलिडीटी दिली जात नाही. शिंदे समिती रेकॉर्ड शोधत नाही. हे सर्व नेमकं काय चाललंय? मराठ्यांचं वाटोळ करण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. फडणवीस यांना मतं आणि नेते मराठ्यांचे लागतात, मात्र त्याच भाजपातील मराठ्यांचे लेकरं मोठे होऊ नयेत ही भूमिका देवेंद्र फडणवीस यांची द्वेषाने भरलेली आहे. तुम्हाला वाटत असेल सत्ता आहे, पण मराठ्यांपुढे या राज्यात शहाणपणा चालत नाही. आंदोलनाची तारीख डिक्लेअर होईल,” असे म्हणत मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. Mamata Banerjee : TMC चे आमदार फुटणार? चर्चांना उधाण; ममता बॅनर्जी काय म्हणाल्या? 4. महापौर सायकलवर, तर विरोधक थेट बैलगाडीतून… पंतप्रधानांनी इंधन बचतीचे आवाहन केले त्याचे पडसाद पिंपरी चिंचवड महापालिकेतही दिसून आले. भाजपच्या नगरसेवकांनी पंतप्रधानांच्या आवाहनाचे समर्थन करत सायकलने प्रवास केला. तर विरोधकांनी महापालिका भवनापर्यंत थेट बैलगाडी आणत इंधन दरवाढ आणि बचतीच्या आवाहनाचा निषेध केला. महापौर रवी लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत सायकलवरून महापालिकेत आगमन केले. तसेच पर्यावरणपूरक वाहतुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न यामागे असल्याचे सांगण्यात आले. तर दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राजू बनसोडे, नगरसेविका स्वाती काटे आणि प्रतिक्षा लांघी-अंघोळकर हे महापालिकेत थेट बैलगाडीवरून दाखल झाले. वाढत्या पेट्रोल-डिझेल दराविरोधात त्यांनी हे अनोखे आंदोलन करत भाजप सरकारवर जोरदार टीका केली. एकाच दिवशी बैलगाडी आंदोलन, सायकलवरून आगमन आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पिंपरी चिंचवड महापालिकेत वेगळच चित्र पाहायला मिळाले. PCMC fuel price protest 5. राखीव प्रवर्गातील परीक्षार्थींना खुल्या जागांवर बंदी, निर्णय वादात मंत्रिमंडळाच्या बैठकीत फडणवीस सरकारनं राखीव जागांवरील उमेदवारांबाबत महत्वाचा निर्णय घेतला.राखीव प्रवर्गात सवलती घेणाऱ्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार, वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेस बसण्याची संधीची सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांची नियुक्ती आता राखीव प्रवर्गातच होणार आहे. ज्या उमेदवारांनी कोणत्याही टप्प्यावर सवलत घेतलेली नाही, ते गुणवत्तेनुसार खुल्या प्रवर्गातून निवडीस पात्र असतील. राज्य सरकारच्या या निर्णयामागे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी समान संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या निर्णयावरुन टीका केली जात आहे. हा निर्णय SC, ST, OBC प्रवर्गावर अन्याय करणारा असून राखीव प्रवर्गातील आरक्षण संपवण्याचा हा डाव असल्याचा आरोप काहींकडून केला जात आहे. Missing Link Accident News : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’वर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, चार जण जखमी 6. “अदानींना सोडवण्यासाठी केलेली डील”; राहुल गांधींचा मोदींवर आरोप उद्योगपती गौतम अदानी यांना अमेरिकेत सुरू असलेल्या कायदेशीर चौकशीत मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गौतम अदानी यांच्याविरोधात दाखल केलेले लाचखोऱी आणि भ्रष्टाचाराचे आरोप मागे घेण्याची अमेरिकेच्या न्याय विभागाची योजना असल्याची माहिती आहे. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. “पंतप्रधानांनी अमेरिकेसोबत केलेला करार हा व्यापार वृद्धीसाठी नसून, अदानींना कायदेशीर कचाट्यातून सोडवण्यासाठी केलेली ‘डील’ आहे,” असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये अमेरिकेतील सरकारी वकिलांनी अदानी, त्यांचा पुतण्या सागर अदानी आणि इतर सहा जणांविरुद्ध लाचखोरी आणि फसवणुकीचे आरोप केले होते. मात्र, ट्रम्प प्रशासनाच्या बदलत्या धोरणांमुळे हे खटले मागे घेण्याची शक्यता आहे. 7. ‘व्हीआयपी संस्कृती’ आऊट! मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या कृतीचे कौतुक तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या एका कृतीचे अनेकांकडून कौतुक केले जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर वर्षानुवर्षे ठेवला जाणारा पारंपारिक पांढरा टॉवेल विजय यांनी हटवला असून, त्यांच्या या निर्णयाचे अनेकांकडून कौतुक होत आहे. प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्ती लिसिप्रीया कांगुजम यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘Xवर तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांना, सरकारी कार्यालयांमध्ये मंत्र्यांपासून ते अगदी कनिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्याच खुर्च्यांवर पांढरा टॉवेल ठेवण्याची एक जुनी प्रथा आहे. ही ‘टॉवेल संस्कृती’ व्हीआयपी मानसिकतेचे प्रतीक असून ती बंद करण्यात यावी, अशी मागणी केली होती. या आवाहनानंतर अवघ्या २४ तासांच्या आत मुख्यमंत्री विजय यांनी कोणतीही अधिकृत घोषणा किंवा प्रसिद्धी न मिळवता शांतपणे आपल्या खुर्चीवरून तो पांढरा टॉवेल हटवला. यानंतर लिसिप्रीयाने “सामान्य जनतेचा आवाज ऐकणारा मुख्यमंत्री”, असे म्हणत विजय यांचे आभार मानले आहेत. Prime Minister Modi: 8. भारत-यूएईमध्ये संरक्षण, एलपीजी पुरवठा, ऊर्जा क्षेत्रात सहकार्य करार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या यूएई दौऱ्यावर असून, तेथील राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन झायद अल नाह्यान यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी काही करार केले. भारत आणि संयुक्त अरब अमिरातीने शुक्रवारी ऊर्जा, संरक्षण, पेट्रोलियम साठा, एलपीजी पुरवठा व शिपिंग क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी अबुधाबीने भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणुकीची घोषणा केली. यात इंडियन स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह लिमिटेड व अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनी यांच्यातील ऊर्जा सहकार्याचा समावेश आहे. तसेच एलपीजी पुरवठ्यासाठी स्वतंत्र सामरिक सहकार्य करारही यावेळी करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियातील संघर्षात यूएईवर झालेल्या हल्ल्यांचा निषेध केला. तसेच भारत शांततेसाठी सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे, असल्याचेही सांगितले. 9. विराट कोहलीचे २०२७ वर्ल्डकपबाबत सूचक विधान भारतीय क्रिकेटचा स्टार विराट कोहली २०२७ च्या एकदिवसीय विश्वकपपूर्वीच निवृत्ती घेण्याची शक्यता असल्याचे त्याच्या विधानातून स्पष्ट होत आहे. विराट कोहली म्हणाला, “मला क्रिकेट खेळण्याची प्रचंड आवड आहे. पण जर मला स्वतःची योग्यता सिद्ध करण्याची वेळ आली, तर ती माझ्यासाठी योग्य जागा नाही.” त्याने स्पष्ट केले की, तो कोणतीही मालिका किंवा सामना खेळण्यासाठी सदैव तयार असेल, त्याला स्वतःला वारंवार सिद्ध करण्याची गरज वाटू नये. एकतर पहिल्याच दिवशी स्पष्टपणे सांगा की मी महत्त्वाचा नाही, किंवा माझ्यावर विश्वास ठेवा. प्रत्येक सामन्यानंतर आपले मत बदलल्याने स्थिर वातावरण निर्माण होत नाही. दरम्यान, विराट कोहलीने २०२४ च्या टी-२० विश्वकप जिंकल्यानंतर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर केली. आता एकदिवसीय क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती घेण्याचे संकेत त्याने दिले आहेत. Virat Kohli 10. “अशिक्षित आणि अज्ञानी लोकांना सत्तेत बसवू नका…” नीट पेपर फुटीनंतर परीक्षा रद्द करण्यात आली असून, सर्व क्षेत्रातून या प्रकरणावर संताप व्यक्त केला जात आहे. अशातच बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक विशाल दादलानीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत या प्रकरणात सरकारला सुनावले आहे. विशाल ददलानी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शिक्षण व्यवस्था आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. तसेच पेपर लीकसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही केली “अशिक्षित आणि अज्ञानी लोकांना सत्तेत बसवू नका…” असे म्हणत त्यांनी मतदारांना मतदान करताना विचारपूर्वक निर्णय घेण्याचे आवाहन केले. अनेक विद्यार्थ्यांनी विशाल ददलानीच्या वक्तव्याला पाठिंबा दर्शवत मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य सततच्या पेपर लीकमुळे धोक्यात येत असल्याची भावना व्यक्त केली. हेही वाचा: Kalyani Priyadarshan: कानमध्ये कल्याणी प्रियदर्शनचा ग्लॅमरस अंदाज; ऑफ-शोल्डर गाऊनमधील लुकची जोरदार चर्चा