TOP 10 NEWS : पेट्रोल-डिझेलबाबत केंद्राचा मोठा निणर्य ते शरद पवारांना NDA ची खुली ऑफर…; वाचा टॉप 10 न्युज !
राजकारण सोडण्याबाबत परेश रावल म्हणाले की, राजकारणासाठी पूर्णवेळ समर्पण आवश्यक आहे. अभिनय आणि राजकारण एकत्र करणं शक्य नसल्याने त्यांनी २०१९ मध्ये राजकारणातून बाहेर पडल्याचं सांगितलं.

1 – अमेरिकेचा हल्ला, इराणचा पलटवार! क्षेपणास्त्रांच्या वर्षावात ३५ जणांचा मृत्यू
अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आता अधिकच धोकादायक वळणावर पोहोचला आहे. अमेरिकेने इराणच्या तेहरानजवळील भागांसह अनेक प्रांतांतील लष्करी तळांवर जोरदार हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये ३५ हून अधिक जणांचा मृत्यू, तर ३०० हून अधिक जण जखमी झाल्याचा इराणचा दावा आहे. (TOP 10 NEWS)
अमेरिकेने नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘बेल्मा’ या तेल टँकरवरही हल्ला केला. प्रत्युत्तरादाखल इराणने मध्यपूर्वेतील अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले सुरू केले आहेत. अमेरिकेने इराणच्या पूल आणि वीज प्रकल्पांवर हल्ला केल्यास, अमेरिकेच्या सर्व पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करण्याचा इशारा इराणने दिला आहे.
2 – ममतांना आणखी एक धक्का.! ३ महिन्यापूर्वी राज्यसभेवर पाठवलेल्या खासदार कोयल यांचा राजीनामा
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला धक्क्यांची मालिका सुरूच आहे. राज्यसभा खासदार आणि अभिनेत्री कोयल मलिक यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने पक्षात खळबळ उडाली आहे. (TOP 10 NEWS)
विशेष म्हणजे, ममता बॅनर्जी यांनी त्यांना एप्रिलमध्येच राज्यसभेवर पाठवलं होतं. अवघ्या तीन महिन्यांत त्यांनी राजीनामा दिला. याआधी सुष्मिता देव आणि सुखेंदू शेखर यांनीही राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. निवडणुकीनंतर अनेक आमदार-खासदारांनी पक्षाची साथ सोडल्याने तृणमूलमधील अंतर्गत संकट अधिकच गडद झालं आहे.
3 – “ही केवळ पेपरफुटी नाही, तर विद्यार्थ्यांच्या भविष्याची चोरी…”; राहुल गांधींचा सरकारवर जोरदार निशाणा
उत्तराखंडमधील पेपरफुटीच्या घटनांवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. डेहराडूनमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले की, पटवारी आणि लेखपालसारखी पदे गुणवत्तेवर नव्हे, तर गुन्हेगारांनी ठरवलेल्या दरांवर मिळत आहे. (TOP 10 NEWS)
सरकारने कॉपीविरोधी कायदा केला, तरी पेपरफुटी थांबलेली नाही. कायदा केवळ कागदावर राहिला आणि परीक्षा पेपर बाजारात विकले जात आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
वर्षानुवर्षे मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांची जागा दुसराच कोणी पैशाने विकत घेतो, ही केवळ पेपरफुटी नाही, तर विद्यार्थ्यांच्या भविष्याची चोरी आहे, असे ते म्हणाले.
4 – पेट्रोल-डिझेलबाबत महत्वाची अपडेट समोर; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा तीव्र झाल्याने कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने डिझेल आणि विमान इंधनाच्या निर्यातीवरील विंडफॉल टॅक्समध्ये मोठी वाढ केली आहे.
डिझेलवरील कर प्रति लिटर ८.५ रुपयांवरून १५.५ रुपये, तर एव्हिएशन टर्बाइन फ्युएलवरील कर ७.५ रुपयांवरून १४.५ रुपये करण्यात आला आहे. हे नवे दर १६ जुलैपासून लागू झाले आहेत.
मात्र, पेट्रोलवरील विंडफॉल टॅक्स प्रति लिटर ४ रुपयांनी कमी करण्यात आला आहे. जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
5 – “अजूनही वेळ गेलेली नाही, पवारांनी NDA मध्ये यावं..”; बड्या केंद्रीय मंत्र्याची खुली ऑफर !
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एनडीए प्रवेशाच्या चर्चांना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वक्तव्याने पुन्हा जोर आला आहे. ‘अजूनही वेळ गेलेली नाही, शरद पवारांनी एनडीएमध्ये सहभागी व्हावे,’ अशी खुली ऑफर आठवले यांनी दिली.
२०१४ किंवा २०१९ मध्ये पवार एनडीएमध्ये आले असते, तर राष्ट्रपतीपदासाठी त्यांचा विचार झाला असता, असंही त्यांनी म्हटलं. सध्या पवारांच्या पक्षाचे आठ खासदार असून, त्यांनी निर्णय घेतल्यास हे खासदार एनडीएसोबत येतील, असा दावा आठवले यांनी केला.
मात्र, सुप्रिया सुळे यांनी एनडीए प्रवेशाच्या चर्चा फेटाळल्या आहेत. पक्षात याबाबत कोणतीही चर्चा किंवा प्रस्ताव नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
6 – कोल्हापुरात भरदिवसा थरार.! भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; महाराष्ट्र हादरला
कोल्हापूर शहरात भरदिवसा झालेल्या गोळीबाराने खळबळ उडाली आहे. भाजप कार्यकर्ता सुरज साखरे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, खासगी सावकारीच्या वादातून हा जीवघेणा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पैशांच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादातून हल्ला झाल्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोरांचा शोध सुरू असून, भरदिवसा झालेल्या या गोळीबारामुळे शहरात सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
7 – सुनेत्रा पवारांना अडचणीत आणण्याचा डाव? मिटकरींचा गंभीर आरोप
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत वादाची चर्चा सुरू असतानाच माजी आमदार अमोल मिटकरी यांनी गंभीर आरोप केले आहेत. काही नेते जाणीवपूर्वक सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला. पक्ष नेतृत्वाला विश्वासात न घेता मुख्यमंत्र्यांशी नेमकी कोणती चर्चा झाली, असा सवाल मिटकरी यांनी उपस्थित केला.
सच्चिदानंद सिंह यांच्या कायदेशीर नोटिशीमागे पक्षातीलच काही नेत्यांचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांना त्रास देणाऱ्या नेत्यांचा पक्ष कार्यकर्ते शोध घेतील, असा इशारा त्यांनी दिला.
8 – 25 हजारांच्या बजेटमध्ये रियलमीचा जबरदस्त फोन लॉंच.! ओप्पो-सॅमसंगशी करणार स्पर्धा
मिड-रेंज स्मार्टफोन खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी रियलमीने Narzo 100x 5G भारतात लॉन्च केला आहे. या फोनची किंमत 20 हजार 999 रुपयांपासून सुरू होत असून, टॉप व्हेरिएंटची किंमत 24 हजार 999 रुपये आहे. फोनमध्ये 6.8 इंचाचा 144Hz डिस्प्ले, 256GB पर्यंत स्टोरेज आणि 50 मेगापिक्सेलचा ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे.
फोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे तब्बल 8000mAh बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट. 500 रुपयांचे कूपन आणि 2 हजार रुपयांच्या ऑफरसह हा फोन 18 हजार 499 रुपयांपासून उपलब्ध होऊ शकतो. 22 जुलैपासून विक्री सुरू होणार आहे.
9 – फिफा विश्वचषकाच्या फायनलची लाईन-अप ठरली; स्पेन-अर्जेंटिना महामुकाबला!
फिफा फुटबॉल विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यात रंगणार आहे. फ्रान्सला हरवून स्पेनने, तर इंग्लंडचा पराभव करून गतविजेत्या अर्जेंटिनाने फायनलमध्ये धडक मारली आहे.
या महामुकाबल्याच्या निमित्ताने एक अद्भूत योगायोग समोर आला आहे. २००७ मध्ये एका फोटोशूटदरम्यान अर्जेंटिनाचा स्टार लिओनेल मेसीने ज्या ६ महिन्यांच्या चिमुरड्याला कडेवर खेळवले होते.
तोच लॅमिन यमाल आता १९ वर्षांचा झाला असून अंतिम सामन्यात स्पेनकडून मेसीविरुद्ध मैदानात उतरेल. हा ऐतिहासिक थरार २० जुलै रोजी न्यूयॉर्कमध्ये पाहायला मिळणार आहे.
10 – पाच वर्षात राजकारण का सोडलं? अभिनेते परेश रावल यांनी आता 12 वर्षांनी केला मोठा खुलासा
अभिनेते परेश रावल यांनी सोशल मीडिया आणि राजकारणापासून दूर राहण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. त्यांनी सांगितलं की, ट्विटरवरील सक्रियतेचा त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम होत होता. सोशल मीडियामुळे रक्तदाब वाढत असल्याने त्यांनी ट्विटर वापरणं थांबवलं.
डॉक्टरांनी झोपण्यापूर्वी न्यूज चॅनेल आणि सकाळी उठल्यानंतर दुपारपर्यंत वर्तमानपत्र वाचू नये, असा सल्ला दिल्याचं त्यांनी सांगितलं. ऑनलाइन उपस्थितीमुळे चांगल्यापेक्षा वाईट जास्त होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
राजकारण सोडण्याबाबत परेश रावल म्हणाले की, राजकारणासाठी पूर्णवेळ समर्पण आवश्यक आहे. अभिनय आणि राजकारण एकत्र करणं शक्य नसल्याने त्यांनी २०१९ मध्ये राजकारणातून बाहेर पडल्याचं सांगितलं. ते 2014 साली गुजरातच्या अहमदाबादमधून निवडून लोकसभेवर गेले होते.















