Todays Top 10 News: लाडकी बहीण योजनेत भ्रष्टाचार, आदित्य ठाकरेंचा सरकारवर प्रहार राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेना उबाठा आमदार आदित्य ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवरून सरकारला चांगलेच धारेवर धरले. लाडकी बहीण योजनेतून अनेक पात्र महिलांची नावे वगळण्यात आल्याचा गंभीर आरोप करत, भ्रष्टाचारामुळे राज्याच्या तिजोरीवर नाहक भार पडत असल्याची टीका त्यांनी केली. मुंबईतील ढासळती हवेची गुणवत्ता आणि वाढत्या प्रदूषणाकडे लक्ष वेधताना, पर्यावरण मंत्र्यांनी केवळ छापील उत्तरे न देता प्रत्यक्ष परिस्थिती पाहावी, असा टोलाही त्यांनी लगावला. राज्यातील अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण आणि पुण्यात काँग्रेस प्रवक्त्यांवर झालेला हल्ला यावरून त्यांनी गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नसण्यावरून भाजपवर निशाणा साधत त्यांनी सरकारच्या कारभाराचा तीव्र निषेध नोंदवला. अजित पवारांच्या विमान अपघातामागे पुन्हा घातपाताचा संशय; रोहित पवारांचा ‘व्हीसीआर’ कंपनीवर गंभीर आरोप ajit pawar and rohit pawar उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आमदार रोहित पवार यांनी खळबळजनक दावा केला असून, हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केलाय. ‘व्हीसीआर’ कंपनीच्या रेकॉर्डमध्ये मोठी हेराफेरी झाल्याचा आरोप करत रोहित पवार म्हणाले की, संबंधित विमानाच्या एकूण ५००० तासांपैकी तब्बल ३००० तासांचे रेकॉर्ड गायब आहे. हे रेकॉर्ड मॅनेज करण्यासाठीच तपासाला जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याचे त्यांनी सोशल मीडियाद्वारे म्हटलेय. डीजीसीए आणि कंपनीच्या संगनमतातून ही बनवाबनवी सुरू असून, मुख्य आरोपीला केवळ पायलट म्हणून चौकशीला बोलावले जाणे दुर्दैवी आहे. विमाकाची उड्डाण क्षमता संपलेली असतानाही ते दादांना का दिले, असा सवाल करत त्यांनी सीआयडी चौकशीतील त्रुटींवर बोट ठेवलेय. ‘डिजिटल अरेस्ट’ ही निव्वळ फसवणूक; मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत सतर्कतेचे आवाहन राज्यात वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ‘डिजिटल अरेस्ट’ ही संकल्पनाच बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले. कायद्यात अशा कोणत्याही अटकेची तरतूद नसून, पोलीस किंवा तपास यंत्रणा व्हिडिओ कॉलद्वारे कधीही कोणाला अटक करत नाहीत. अशा प्रकारचे कॉल १०० टक्के फसवणूक असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले. फसवणूक झाल्यास तातडीने ‘१९३०’ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. पहिल्या एक तासातील (गोल्डन अवर) तक्रार गेलेले पैसे परत मिळवून देण्यास मदत करू शकते. या गुन्ह्यांची सूत्रे परदेशातून हलविली जात असून, नागरिकांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता सायबर पोलिसांशी संपर्क साधावा, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. केरळचे नाव आता ‘केरळम’ होणार; ‘सेवा तीर्थ’मध्ये मंत्रिमंडळाची पहिली बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘सेवा तीर्थ’ या नवीन कार्यालयात मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत केरळ सरकारचा राज्याचे नाव बदलून ‘केरळम’ करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने अधिकृत मंजुरी दिलीय. आगामी केरळ विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. १९४७ पासून सत्तेचे केंद्र राहिलेल्या साउथ ब्लॉकमधून पंतप्रधान कार्यालय (PMO) आता दारा शिकोह रोडवरील अत्याधुनिक ‘सेवा तीर्थ’ संकुलात स्थलांतरित झालेय. सुमारे ११८९ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या ५ एकरच्या संकुलात कॅबिनेट सचिवालय आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचे कार्यालयही असेल. दरम्यान, जुन्या नॉर्थ-साउथ ब्लॉक इमारतींचे रूपांतर आता ‘युगे-युगेन भारत’ या जागतिक दर्जाच्या राष्ट्रीय संग्रहालयात केले जाणार आहे. AIADMK कडून आश्वासनांचा पाऊस; कुटुंबांना 10 हजार तर बेरोजगारांना भत्त्याची घोषणा AIADMK general secretary Edappadi K Palaniswami तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर AIADMK ने आपल्या जाहीरनाम्याचा तिसरा टप्पा प्रसिद्ध करत मतदारांना मोठी आश्वासने दिलेत. पक्षाचे सरचिटणीस एडप्पादी के. पलानीस्वामी यांनी दिवंगत नेत्या जे. जयललिता यांच्या ७८ व्या जयंतीनिमित्त या घोषणा केल्या. या जाहीरनाम्यानुसार, राज्यातील प्रत्येक कुटुंबाला मालमत्ता कर आणि वीज शुल्काचा भार हलका करण्यासाठी १० हजार रुपयांची एकरकमी मदत दिली जाईल. पदवीधर बेरोजगारांना दरमहा २ हजार रुपये, तर १२ वी उत्तीर्ण तरुणांना १ हजार रुपये भत्ता देण्याचे आश्वासन देण्यात आलेय. याशिवाय मच्छिमारांच्या मदतीत वाढ, विणकरांना अतिरिक्त मोफत वीज आणि महिलांना दरमहा २ हजार रुपये देण्याचे वचन पक्षाने दिले असून, सत्ताधारी DMK सरकारवर वाढत्या महागाईवरून सडकून टीका केलीय. विमानांच्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला; स्पाइसजेटचे दिल्लीत आपत्कालीन लँडिंग दिल्लीहून लेहकडे जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाला इंजिनमधील बिघाडामुळे मंगळवारी सकाळी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर तातडीने उतरवण्यात आले. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच इंजिन क्रमांक २ मध्ये तांत्रिक समस्या उद्भवल्याने वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमान पुन्हा दिल्लीकडे वळवले. या विमानात एकूण १५० प्रवासी आणि कर्मचारी होते. सुदैवाने, हे लँडिंग सुरक्षितरीत्या पार पडले असून एअरलाईनने आगीची कोणतीही घटना घडली नसल्याचे स्पष्ट केलेय. दरम्यान, गेल्या काही दिवसांत विमान प्रवासादरम्यान तांत्रिक बिघाडाच्या घटनांमध्ये वाढ झालीय. नुकतेच एअर इंडियाच्या लंडन-बेंगळुरू विमानातील इंधन नियंत्रण स्विचमध्ये बिघाड झाल्याचे समोर आले होते, तर मुंबई-जयपूर स्पाइसजेट विमानालाही लँडिंग गिअरमधील बिघाडामुळे आपत्कालीन लँडिंग करावे लागले होते. या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना अटक होणार? Shankaracharya Avimukteswarananda मुलांच्या लैंगिक शोषणाच्या गंभीर आरोपाखाली एफआयआर दाखल झाल्यानंतर प्रयागराज पोलिसांनी शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्याविरोधात तपासाचा फास आवळलाय. पोलिसांचे एक पथक वाराणसीत दाखल झाले असून आज त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे; प्रसंगी त्यांना अटकही केली जाऊ शकते. पोलिसांनी सोमवारी रात्री वाराणसीत त्यांच्या निकटवर्तीयांची माहिती गोळा केली, तर दुसऱ्या पथकाने हरदोई येथे पीडित कुटुंबाचे जबाब नोंदवले. दुसरीकडे, यूपी काँग्रेसने या कारवाईला ‘राजकीय सूड’ असल्याचे म्हटले असून प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून निष्पक्ष चौकशीची मागणी केलीय. दरम्यान, शंकराचार्यांनी सर्व आरोप फेटाळले असून संबंधित मुले आपल्या गुरुकुलातील नसल्याचा दावा केलाय. त्यांनी पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असून ते सध्या आपल्या आश्रमात वकिलांशी चर्चा करत आहेत. घटस्फोटांच्या प्रमाणात 50% वाढ; महिलांचा पुढाकार वाढला भारतात गेल्या दोन दशकांत घटस्फोटांच्या प्रमाणात ५०% वाढ झाली असून, मेट्रो शहरांमध्ये ही परिस्थिती अधिक गंभीर आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे आणि ताज्या आकडेवारीनुसार, घटस्फोटासाठी पुढाकार घेणाऱ्यांमध्ये आता महिलांचे प्रमाण ५८% पर्यंत पोहोचलेय. विशेषतः मुंबईसारख्या शहरात लग्नानंतर अवघ्या तीन वर्षांतच संबंध तुटण्याचे प्रमाण ४०% आहे. महाराष्ट्रात घटस्फोटाचा दर १८.७% असून तो देशात सर्वाधिक आहे. परस्पर संमतीने वेगळे होण्यासोबतच क्रौर्य २३% आणि घरगुती हिंसाचार १४.५% ही मुख्य कारणे समोर येत आहेत. सुशिक्षित महिला आपल्या अधिकारांबाबत जागरूक झाल्याने हा बदल दिसतोय. दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरू यांसारख्या शहरांत गेल्या तीन वर्षांत घटस्फोटाच्या केसेसमध्ये तीन पट वाढ झालीय. सरासरी ३१ वर्षे वयोगटातील महिला आणि ३६ वर्षांचे पुरुष घटस्फोटाचा निर्णय घेताना दिसत आहेत. ‘कांतारा’ वादात रणवीर सिंहची हायकोर्टात धाव; एफआयआर रद्द करण्याची मागणी ranveer singh बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहने ‘कांतारा: चॅप्टर १’ चित्रपटाबाबत केलेल्या विधानावरून दाखल झालेला एफआयआर रद्द करण्यासाठी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. गेल्या वर्षी गोव्यातील चित्रपट महोत्सवात रणवीरने ऋषभ शेट्टीच्या अभिनयाचे कौतुक करताना एका दृश्याचा उल्लेख केला होता. मात्र, तक्रारदार वकील प्रशांत मेथल यांनी या विधानातून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत तक्रार केली. दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशानंतर बेंगळुरू पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून रणवीरला नोटीस बजावलीय. सोमवारी झालेल्या सुनावणीत रणवीरच्या वकिलांनी तातडीच्या सुनावणीची विनंती केली, ज्यावर न्यायालयाने मंगळवारी सुनावणी निश्चित केली होती. रणवीरने यापूर्वीच सोशल मीडियाद्वारे या प्रकरणावर जाहीर माफी मागितली असून आपला हेतू केवळ अभिनयाचे कौतुक करण्याचा असल्याचे स्पष्ट केलेय. महिला T20 मध्ये भारताची सलामी पाकिस्तानविरुद्ध; 12 जूनपासून रंगणार थरार आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ चे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले असून यंदा प्रथमच विक्रमी १२ संघ जेतेपदासाठी भिडणार आहेत. या स्पर्धेचा थरार १२ जूनपासून इंग्लंडमध्ये रंगणार असून सलामीच्या लढतीत यजमान इंग्लंडचा सामना श्रीलंकेशी होईल. भारतीय महिला संघ आपल्या मोहिमेची सुरुवात १४ जून रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्याने करेल. टीम इंडियाचा समावेश असलेल्या गटामध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि नेदरलँड्स यांसारख्या तगड्या संघांचा समावेश आहे. एकूण ३३ सामन्यांच्या या स्पर्धेत दोन गटांतील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजोग गुप्ता यांनी ही स्पर्धा महिला क्रिकेटच्या विस्तारासाठी मैलाचा दगड ठरेल असा विश्वास व्यक्त केलाय. आतापर्यंत ६ वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व मोडीत काढण्याचे आव्हान भारतीय संघासमोर असेल. स्पर्धेचा अंतिम सामना ५ जुलै रोजी खेळवला जाईल.