Tirupati laddu Controversy : तिरूपती प्रकरणानंतर कर्नाटक सरकारने जारी केला ‘हा’ आदेश; सर्व मंदिर संस्थांना सांगितलं….

Tirupati laddu Controversy – आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात उपलब्ध असलेल्या लाडू प्रसादाच्या तुपात प्राण्यांची चरबी आढळून आल्याच्या बातमीने खळबळ उडाली असून हिंदूंच्या श्रद्धेवर हा मोठा आघात असल्याचे म्हटले जात आहे. त्याचवेळी या वादानंतर आता कर्नाटक सरकारही कारवाईच्या मोडमध्ये आले आहे.
राज्यातील कॉंग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारने एक निर्देश जारी केला असून, राज्याच्या मंदिर व्यवस्थापन संस्थेच्या अंतर्गत असलेल्या सर्व 34,000 मंदिरांमध्ये ‘नंदिनी’ ब्रँड तूप वापरणे अनिवार्य केले आहे.
कर्नाटक सरकारच्या नवीन निर्देशानुसार, त्यांच्या अखत्यारीतील सर्व मंदिरांना मंदिरातील दिवे लावणे, प्रसाद तयार करणे आणि दसोहा भवन (जेथे भक्तांना भोजन दिले जाते) यासारख्या धार्मिक विधींमध्ये फक्त नंदिनी तूप वापरण्यास सांगितले आहे.
कर्नाटक सरकारने मंदिरातील कर्मचाऱ्यांना प्रसादाच्या गुणवत्तेशी कधीही तडजोड केली जाणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत. तिरुपती येथील प्रसिद्ध व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात लाडू बनवताना प्राण्यांच्या चरबीच्या कथित वापरावरून मोठ्या वादानंतर हे निर्देश आले आहेत.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी मंदिरात वापरल्या जाणाऱ्या तुपाच्या गुणवत्तेबद्दल चिंता व्यक्त केली होती आणि नमुन्यांमध्ये टॅलो आणि इतर प्राण्यांच्या चरबीची उपस्थिती असल्याचा दावा केल्यानंतर भाविकांना धक्का बसला असून मोठा वाद सुरू झाला आहे.
तिरुपती मंदिराच्या स्वयंपाकघरात दररोज सुमारे 3 लाख लाडू बनवले जातात. ते तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात साहित्य आवश्यक आहे, ज्यामध्ये काजू, बेदाणे, वेलची, बेसन आणि साखर यासारख्या इतर आवश्यक गोष्टींसह 1,400 किलो तुपाचा समावेश आहे.





