CM Devendra Fadnavis: “टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणे आणि त्याला शिवरायांपेक्षा मोठे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही कदापि सहन करणार नाही,” असे ठणकावून सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत विरोधकांना जोरदार उत्तर दिले. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना फडणवीस यांनी इतिहास, अर्थव्यवस्था, गुंतवणूक आणि रोजगार अशा विविध मुद्द्यांवर सरकारची बाजू भक्कमपणे मांडली. इतिहासाचे चुकीचे सादरीकरण- अनेक वर्षांपासून देशाच्या इतिहासाचे चुकीचे सादरीकरण केले गेल्याचा आरोप करत मुख्यमंत्री म्हणाले की, टिपू सुलतानने ७५ हजार हिंदू आणि ३३ हजार नायरांची केलेली क्रूर कत्तल कधीच शिकवण्यात आली नाही. टिपू इंग्रजांशी लढला हे खरे असले, तरी तो देशासाठी नव्हे तर स्वतःचे राज्य वाचवण्यासाठी लढला, हे कधीच सांगण्यात आले नाही, असेही ते म्हणाले. एनसीआरटीच्या पुस्तकात मोघल साम्राज्याला १७ पाने देण्यात आली, तर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केवळ एकच परिच्छेद होता. मात्र आता मोदी सरकारने एनसीआरटीच्या पुस्तकात मराठ्यांच्या इतिहासाला २० पाने दिल्याचे त्यांनी अधोरेखित केले. खरा इतिहास वेळेत शिकवला असता तर देशातील एकाही मुसलमानाने औरंगजेबाला हिरो म्हटले नसते, असेही ते म्हणाले. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलरच्या दिशेने – अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था हाफ ट्रिलियन डॉलरच्या वर गेली असून ट्रिलियन डॉलरचा टप्पा गाठल्यावर महाराष्ट्र जगात १३-१४ व्या क्रमांकावर पोहोचेल. देशाच्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी ३९ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले. दावोस हा केवळ कागदी करारांचा सोहळा नसून तेथून प्रत्यक्ष व्यवसाय घेऊन येतो, असे सांगत टीकाकारांना त्यांनी सडेतोड उत्तर दिले. हेही वाचा – अजित पवार यांच्या विमान अपघाताचा सीआयडी तपास योग्य दिशेने – अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद दीड लाख सरकारी नियुक्त्या; गडचिरोलीला स्टील सिटी – महायुती सरकार सत्तेत आल्यापासून आतापर्यंत १ लाख २० हजार ४४९ जणांना नियुक्त्या देण्यात आल्या असून हा आकडा लवकरच दीड लाखापर्यंत पोहोचेल, असे फडणवीस यांनी सांगितले. गडचिरोलीतील नक्षलवाद संपुष्टात आणता आला, कारण विकास तुमच्यासाठी आहे ही भावना तेथील नागरिकांमध्ये निर्माण करण्यात यश आले, असे सांगत गडचिरोलीला स्टील सिटी बनवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. नाशिक कुंभमेळ्यातून महाराष्ट्राचे जागतिक ब्रँडिंग – कुंभमेळ्यावरील विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, कुंभमेळा हा जागतिक अमूर्त वारसा आहे. एका कुंभमेळ्याने उत्तर प्रदेशचे जगभरात ब्रँडिंग झाले, तसेच नाशिक कुंभमेळ्यातून महाराष्ट्राचे जागतिक ब्रँडिंग करण्याचा सरकारचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तात्पुरत्या व्यवस्थांऐवजी शाश्वत विकासावर अधिक लक्ष केंद्रित केल्याचेही त्यांनी सांगितले.