Devendra Fadnavis : “अशा प्रकारची वक्तव्ये…..”; खासदार संजय दिना पाटलांच्या वक्तव्यावर फडणवीस आक्रमक
Devendra Fadnavis : शिवसेना (शिंदे गट) खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Devendra Fadnavis : शिवसेना (शिंदे गट) खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली असून, अशा प्रकारची वक्तव्ये महायुतीत खपवून घेतली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना सोडून अलीकडेच शिंदे गटात दाखल झालेले खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसमोर येत संजय दिना पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करावी, असे सांगितल्याचे स्पष्ट केले होते.
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी झालेल्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी माध्यमांशी बोलताना संयम व तारतम्य बाळगणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. माध्यमांशी अर्वाच्य भाषेचा वापर करणाऱ्या खासदाराला कठोर शब्दांत समज द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे व्यक्त केल्याचे समजते.
सरकारची प्रतिमा मलिन करणारी कोणतीही बाब सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेतील काही नेते व पदाधिकाऱ्यांच्या यापूर्वीच्या वादग्रस्त वक्तव्यांचाही आढावा घेतल्याचे सांगितले जात आहे. महायुतीतील सर्व आमदार, खासदार आणि मंत्र्यांना जबाबदारीने वागण्याच्या सूचना द्याव्यात, असेही त्यांनी शिंदे यांना सांगितल्याची माहिती आहे.
यापुढे महायुतीतील कोणत्याही लोकप्रतिनिधीकडून अशा प्रकारची वादग्रस्त वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत, असा स्पष्ट संदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे संजय दिना पाटील यांच्या प्रकरणात शिंदे गटाकडून पुढे कोणती भूमिका घेतली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
काय आहे प्रकरण?
खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना आक्षेपार्ह भाषा वापरत धमकीवजा विधान केले होते. या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर टीका होत आहे.





