Dattatreya Bharane : “वाकडं करून परत सरळ करणारे लक्षात राहतात! नवे कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंच्या वक्तव्याने खळबळ”

Agriculture Minister Dattatreya Bharane : इंदापूर येथे महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नवनिर्वाचित कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या एका विधानाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. महसूल अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना भरणे म्हणाले, “सरळ काम सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करणारे लक्षात राहतात.” या विधानामुळे उपस्थितांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले, तर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. या वक्तव्याचा नेमका अर्थ काय, यावर आता उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.
महसूल विभागाकडून पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा अपेक्षित असताना, भरणे यांच्या या सल्ल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी पुढे शेतकऱ्यांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण आणि योजनांचा लाभ योग्य हक्कदारांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला. मात्र, त्यांचे हे वक्तव्य त्यांच्यासाठी अडचणी ठरू शकते, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
कृषिमंत्रीपद स्वीकारल्यानंतर भरणे यांनी भावनिक प्रतिक्रिया देताना सांगितले, “माझे वडील आणि चुलते आज हयात असते, तर त्यांना खूप आनंद झाला असता. ते शेतकरी होते, आणि मी शेतकऱ्याचा मुलगा असून आज कृषिमंत्री झालो आहे. मला कोणतीही फिल्डिंग लावावी लागली नाही. शेतात फिरताना मला कळलं की कृषी खातं माझ्याकडे येत आहे. कार्यकर्त्यांची इच्छा होती की मी कृषिमंत्री व्हावं, आणि आता ती पूर्ण झाली आहे.”
या खात्याचा उपयोग सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी प्रभावी उपाययोजना राबवण्यासाठी करणार असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. मात्र, त्यांच्या या अजब विधानामुळे स्थानिक पातळीवर जोरदार चर्चा रंगली असून, नव्या कृषिमंत्र्यांचे हे मार्गदर्शन कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.





