“आता माघार नाही, लवकरच पेढे भेटणार”, काॅंग्रेसचे माजी आमदार गोरंट्याल यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित?

जालना: जालना विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गोरंट्याल हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी ते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. आणि आता त्यांनी शेरोशायरीच्या माध्यमातून भाजप प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
गोरंट्याल यांनी पत्रकारांशी बोलताना काँग्रेसवर आरोप केले. “मी विद्यमान आमदार असताना मला पहिल्या यादीत तिकीट दिले नाही. उशिरा तिकीट मिळाल्याने परिणाम नकारात्मक झाला. पक्षाने मला फक्त तिकीट दिले, नेत्यांच्या सभा किंवा अन्य कोणतेही समर्थन दिले नाही. मला वाऱ्यावर सोडले,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. याशिवाय, त्यांनी आपल्या शेरोशायरीतून मनातील भावना व्यक्त केल्या:
“कब का टूथ चुका था मैं, बस बिखरना है मुझे…
तुम्हारे हजारो साल से मेरी खामोशी सही, न जाने कितने राजो को पर्दा रखती है..!”
या शायरीच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेस सोडून भाजपात जाण्याचे संकेत दिले आहेत. “आता माघार नाही, लवकरच पेढे भेटणार,” असे सांगत त्यांनी पक्षांतराचा निर्णय जवळपास निश्चित असल्याचे स्पष्ट केले.
गोरंट्याल यांनी यापूर्वीच विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षांतराचे संकेत दिले होते. “मी एकदा बोललो की बोललो, आता पाच वर्षे वाट पाहणार नाही,” असे त्यांनी ठणकावले होते. जालन्यातील आपल्याच पक्षातील काही नेत्यांनी घात केल्याची खदखद त्यांनी व्यक्त केली होती. खासदार कल्याण काळे यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगीही त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. “माझं झालं, पण २०२९ मध्ये तुमचं असं होऊ नये,” असा सल्ला त्यांनी खासदार काळे यांना दिला होता.
जालना मतदारसंघात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत गोरंट्याल यांचा शिवसेना (शिंदे गट) उमेदवार अर्जुन खोतकर यांच्याकडून ३१,६५१ मतांच्या फरकाने पराभव झाला होता. यापूर्वी २०१९ मध्ये गोरंट्याल यांनी खोतकर यांचा २५,३३८ मतांनी पराभव केला होता, तर २०१४ मध्ये खोतकर यांनी गोरंट्याल यांना पराभूत केले होते.
सध्या गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने जालना मतदारसंघात राजकीय वातावरण तापले आहे. त्यांच्या या संभाव्य पक्षांतरामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.





