मंचर, (प्रतिनिधी) – कळंब (ता. आंबेगाव) येथे गेल्या चार-पाच दिवसात पंधरा ते वीस नाग साप घरांमध्ये निघाल्याने ग्रामस्थामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वातावरणात उष्णता निर्माण झाल्याने सर्प निघण्याचे प्रमाण वाढले असल्याने नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे.
कळंब येथील सर्पमित्र जितेंद्र उर्फ धर्मेंद्र मधुकर भालेराव आणि विशाल बाजीराव कानडे हे दोन्ही मित्र कळंब परिसरात घरामध्ये नजर चुकवून घुसणारे सर्प शिताफीने पकडण्याचे काम करीत आहेत. उन्हाच्या तीव्रतेमुळे तापमानात मोठ्या प्रमाणावर उष्णतेत वाढ झाली आहे.
त्यामुळे कळंब आणि कळंब पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणावर विषारी नाग,घोणस,धामण तसेच विविध जातीचे नवीन सर्प घरामध्ये निघण्याचे प्रमाण वाढले आहे. पंचक्रोशीत कोणत्याही नागरिकाचा फोन आल्यानंतर सर्पमित्र विनामूल्य सर्प पकडून जंगल परिसरात व्यवस्थित सोडून देण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून करीत आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रात्री अपरात्री किचनमध्ये, गोठ्यात बाल्कनीत तसेच घराच्या कानाकोपऱ्यात कुठेही घुसलेल्या सर्पाला पकडण्याचे काम मोठ्या जिद्दीने आणि कसोसीने पकडण्याचे काम सर्पमित्र करीत आहेत.
सध्या तापमान हे ४२°c च्या पुढे गेले असल्यामुळे सर्प रात्रीच्या वेळी दिवसा उन्हाच्या तीव्रतेमुळे बाहेर पडतात. शेतात असणाऱ्या घरामध्ये किचनच्या बाजूने असणाऱ्या पाठीमागील बाजूच्या खिडकीमधून सर्प घरात घुसण्याचे प्रमाण वाढले आहे.
त्यामुळे पाठीमागील बाजूच्या खिडक्यांना नागरिकांनी जाळ्या बसवून घेणे गरजेचे आहे. तसेच महिलांनी घरामध्ये काम करताना काळजीपूर्वक काम करावे कारण की, सर्प हे कुठेही अडचणीच्या ठिकाणी लपून बसतात व जीवाच्या भीतीने ते समोरच्या व्यक्तीला दंश करतात.
त्यामुळे घरातील महिला, लहान मुले व घरातील इतर मंडळी यांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे. गेल्या चार-पाच दिवसात सर्पमित्र धर्मेंद्र आणि विशाल यांनी जवळपास १५ ते २० सर्प परिसरात पकडले आहेत. शुक्रवारी रात्री अजय विश्वासराव यांच्या घरात घुसलेल्या विषारी जातीच्या नागाला पकडले.तसेच प्रवीण कानडे यांच्या घरात घुसलेल्या नागालाही पकडण्यात आले. लौकी या ठिकाणी बारा फूट लांबीची धामण जातीचा सर्प पकडण्यात आला. अशी माहिती सर्प मित्र धर्मेंद्र आणि विशाल यांनी दिली आहे.
सर्पमित्रांची भूमिका महत्त्वाची
सर्पमित्रांना शासनाने मानधन देणे गरजेचे आहे. ते स्वतःच्या जीवावर उदार होऊन नागरिकांची जीव वाचवण्यासाठी सर्प पकडत असतात. मध्यंतरी कितीतरी सर्पमित्रांना नागाने दंश केल्याने आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. तरीसुद्धा काही सर्पमित्र अजूनही हे काम विना मोबदला करताना परिसरामध्ये दिसून येतात.
नागरिकांनी सुद्धा घरामध्ये किंवा अन्य कुठेही सर्प पकडल्यानंतर स्वखुशीने सर्पमित्रांना बक्षीस देऊन त्यांच्या कार्याची प्रशंसा करणे गरजेचे आहे. असे मत लोकनियुक्त सरपंच उषा सचिन कानडे यांनी व्यक्त केले आहे.