…तर एक वेगळा पक्षच उभा राहील; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा

नाशिक : मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा जर आपण एक साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील. इतकी मोठी ताकद मुंडे साहेबांच्या प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये आहे, असे धक्कादायक विधान भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन मुंडे बंधु- भगिनींना टार्गेट केले जात असतानाच त्यांनी केलेल्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिकच्या सिडको परिसरामध्ये वारकरी भावनांच्या लोकार्पण सोहळा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी आपण वारकरी संप्रदायतील लोक असून आपला माफ करणे हा गुणधर्म आहे. जुगारी कार्यकर्ते सांभाळण्यापेक्षा असे वारकरी कार्यकर्ते सांभाळणे चांगले, असे मत त्यांनी व्यक्त केले.
तसेच गोपीनाथ मुंडेंचे नाव घेत एक मोठे विधानही केले. ‘मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा जर आपण एक साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील इतकी मोठी ताकद मुंडे साहेबांच्या प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये आहे आणि एवढी मोठी संख्या मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांची आहे.
पर्यायाने माझ्याबरोबर जोडले गेलेले केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून मला जोडले जाऊ शकले नसते, लोक गुणांचा स्वीकार करतात, लोक मुंडे साहेबांच्या गुणांवर प्रेम करतात. मुंडे साहेबांनी भाजप पक्षाच्या जन्मापासून काम केले आणि तो पक्ष उभा केला, असेही त्या म्हणाल्या.





