Manikrao Kokate : ”कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकीच…”; माणिकराव कोकाटेंचं विधान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात

Manikrao Kokate : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून चर्चेचा विषय ठरले आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी कृषिमंत्रिपदाची तुलना ‘ओसाड गावच्या पाटीलकी’शी केली. या विधानामुळे कोकाटे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
अ. भा. बळीराजा संघटना भारततर्फे एमजीएमच्या आर्यभट्ट सभागृहात आयोजित शेतकऱ्यांच्या गुणवंत पाल्यांच्या सत्कार समारंभात कोकाटे बोलत होते. ते म्हणाले, “कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी आहे आणि मला हे खाते दिलंय”. या विधानातून त्यांनी कृषी खात्याबाबत नाराजी व्यक्त केली .
या आधीही कोकाटे यांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील दौऱ्यात ‘ढेकळांचे पंचनामे करायचे का?’ असे विधान करून शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या होत्या. या वक्तव्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता .
या वादग्रस्त विधानांमुळे कोकाटे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. त्यांच्या विधानांमुळे शेतकरी वर्गात नाराजी पसरली असून, विरोधकांनीही त्यांच्यावर टीका केली आहे.
कृषिमंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीविषयक शिक्षण घेऊन, शेती आधारित व्यवसायात करिअर करावे, असा सल्ला दिला. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान हे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करत आहेत, असेही त्यांनी सांगितले. कोकाटे यांच्या या विधानांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, त्यांच्या वक्तव्यांवरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.





