“मुघलांनी त्यांच्या काळात कधीच जबरदस्तीने धर्मांतर आणि अत्याचार केला नाही”; काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली: काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर नेहमी कोणत्या ना कोणत्या वादात अडकलेले दिसतात. यावेळी पुन्हा एकदा अय्यर वादात सापडले आहेत. मणिशंकर अय्यर यांनी मुघल आणि मुस्लिमांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
‘मुघलांनी धर्माच्या नावाखाली कधीही अत्याचार केला नाही. आम्ही(काँग्रेस) अकबराला आपलाच मानतो,’ असे अय्यर म्हणाले. याशिवाय, त्यांनी भाजपवर टीका करताना जिन्नाचेही कौतुक केले आहे.
मणिशंकर अय्यर यांनी जुन्या जनगणनेचा दाखला देत म्हटले की, 1872 मध्ये देशात 72 टक्के हिंदू आणि 24 टक्के मुस्लिम होते. कमी-अधिक प्रमाणात ही संख्या अजूनही तेवढीच आहे, त्यामुळे मुस्लिमांवर लोकसंख्या वाढल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे.
मणिशंकर अय्यर यांनी यावेळी मुघल राजवटीचेही कौतुक केले. नेहरू जयंतीनिमित्त एका कार्यक्रमादरम्यान मणिशंकर अय्यर यांनी मुघल राजवटीत झालेल्या अत्याचाराच्या चर्चेचे खंडन केले. मुघल सम्राट अकबरापासून ते इतर सर्व मुघल सम्राटांपर्यंत, मुघल राजवटीत कोणतेही जबरदस्तीने धर्मांतर झालं नसल्याचा दावा त्यांनी केला.
मुघल राजवटीची स्तुती करताना अय्यर म्हणाले की, ब्रिटीश आणि मुघल यांच्यातील मोठा फरक म्हणजे मुघल या देशाला आपला मानत होते. अय्यर यांनी बाबरचे कौतुक करताना म्हटले की, बाबरने आपला मुलगा हुमायूनला एक पत्र लिहिले होते, ज्यामध्ये त्याने भारतातील लोकांच्या धर्मात हस्तक्षेप न करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळेच अकबराच्या काळात धर्माच्या नावावर कधीच भेदभाव झाला नव्हता.
मुघलांनी हा देश स्वतःचा बनवला. बाबर 1526 मध्ये भारतात आला आणि तो 1530 मध्ये मरण पावला. म्हणजे तो भारतात फक्त 4 वर्षे राहिला. त्याने हुमायुनला सांगितले की, जर हा देश चालवायचा असेल, जर इथल्या रहिवाशांच्या धर्मात ढवळाढवळ करू नको, असंही अय्यर म्हणाले.
अय्यर यांनी यावेळी भाजपवरही जोरदार हल्ला चढवला. सत्तेत असलेल्यांनाच देशातील 80 टक्के जनतेची चिंता आहे, असा आरोप त्यांनी केला. सत्तेत असलेल्यांसाठी फक्त 80% लोक खरे भारतीय आहेत, बाकीचे पाहुणे म्हणून जगत आहेत.
मुस्लिमांच्या लोकसंख्येबाबत त्यांनी केलेल्या विधानाच्या समर्थनार्थ युक्तिवाद मांडताना त्यांनी वस्तुस्थितीही मांडली. जुन्या जनगणनेचा दाखला देत मणिशंकर अय्यर म्हणाले की, 1872 मध्ये ब्रिटिशांनी पहिली जनगणना केली तेव्हापासून आतापर्यंत भारतात कमी-अधिक प्रमाणात मुस्लिमांची संख्या 24 टक्के आणि हिंदू 72 टक्के असल्याचे दिसून आलं आहे.
ते पुढे म्हणाले की, भाजपवाले म्हणतात की, त्या काळात हिंदू मुलींवर बलात्कार झाले आणि सगळ्यांना मुस्लिम केले. पण, तुम्ही मुस्लिम झाला असता तर आज आकडेवारी वेगळी असायला हवी होती. आज देशात 72 टक्के मुस्लिम असायला हवे होते आणि 24 टक्के हिंदू असायला हवे होते.
फाळणीची मागणी करण्यापूर्वी जिन्नाची एकच मागणी होती की, सेंट्रल असेंब्लीमध्ये 30 टक्के आरक्षण द्यावे. त्यांनी कधीच 80 किंवा 90 टक्के मागितले नाही. त्यांनी 30 टक्के मागितले आणि तेही नाकारले गेले, असंही ते म्हणाले.





