Pune District : अंगणवाड्यांतील बालकांच्या जीवाशी खेळ मांडला
Pune District : या प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

शिरूर : “सुदृढ बालक, सशक्त भारत” या शासनाच्या संकल्पनेलाच शिरूर शहरातील काही अंगणवाड्यांनी हरताळ फासल्याचे नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांनी केलेल्या अचानक पाहणीत धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अन्न व औषध प्रशासनाने ही याकडे लक्ष देऊन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी आता शिरूर शहरवासीयांकडून होत आहे.
बालकांच्या आरोग्याचा पाया मानल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या व्यवस्थेत गंभीर त्रुटी, मुदतबाह्य मसाल्यांचा वापर, अन्नधान्याची उघड्यावर साठवणूक, अस्वच्छ परिसर, अपूर्ण नोंदी आणि कामकाजातील निष्काळजीपणा अशा गंभीर बाबी नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांच्या अचानक पाहणीत उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
शिरूर नगरपरिषदेमार्फत शहरातील विविध भागांत दहा अंगणवाड्या चालविल्या जात आहेत. मात्र, त्यापैकी काही अंगणवाड्यांमध्ये आढळलेल्या अनियमिततेमुळे बालकांना दिला जाणारा पोषण आहार सुरक्षित आहे का, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
नगराध्यक्षा पाचर्णे यांनी उपनगराध्यक्ष मितेश गादिया, महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती स्वप्नाली जामदार, नगरसेवक सागर नरवडे, नगरसेविका सुनीता भुजबळ, विविध अंगणवाड्यांना अचानक भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी अनेक ठिकाणी पोषण आहाराचे साहित्य योग्य पद्धतीने न ठेवता उघड्यावर साठविल्याचे दिसून आले. काही ठिकाणी मुदत संपलेले मसाले व खाद्यपदार्थ आढळल्याने उपस्थित पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
अंगणवाडी परिसरात स्वच्छतेचा अभाव, गर्भवती महिलांच्या अपूर्ण नोंदी, बालकांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांची कमतरता तसेच दैनंदिन कामकाजातील हलगर्जीपणा स्पष्टपणे निदर्शनास आला. यामुळे बालकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वीही नगराध्यक्षा पाचर्णे यांनी अंगणवाड्यांमधील त्रुटींबाबत संबंधितांना तंबी देऊन सुधारणा करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतरही अपेक्षित बदल न झाल्याने नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत असल्यामुळे त्यांनी पुन्हा अचानक तपासणी केली. पाहणीत अनेक गंभीर बाबी पुन्हा समोर आल्याने संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू करण्यात आलेल्या अंगणवाडी योजनांमध्ये जर अशा प्रकारचा निष्काळजीपणा होत असेल, तर त्याची गंभीर दखल घेऊन संपूर्ण व्यवस्थेचे लेखापरीक्षण करण्याची गरज असल्याचे मतही नागरिक व्यक्त करत आहेत.
आहार गुणवत्तेत तडजोड चालणार नाही
नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांनी संबंधित अंगणवाडी सेविका, पोषण आहार पुरवठादार आणि व्यवस्थापनाशी संबंधित व्यक्तींना कडक शब्दांत सुनावत तातडीने सुधारणा करण्याचे आदेश दिले. “अंगणवाड्यांतील स्वच्छता, पोषण आहाराची गुणवत्ता आणि व्यवस्थापनात कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. सुधारणा न झाल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.





