Bangladesh Violence: बांगलादेशातील तख्तपालटाची इनसाइड स्टोरी ! लष्कराच्या अधिकाऱ्यांनी आदेश मानण्यास दिला होता नकार

ढाका – बांगलादेशात हिंसाचार हाताबाहेर गेल्यानंतर त्या देशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आणि देश सोडून भारतात आश्रय घेतला आहे. त्यांनी देश सोडल्यानंतर बांगलादेशची अवस्था बरीच बिकट झाली आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक विश्वासु सदस्यांनी देश सोडत परदेशात जाणे पसंत केले आहे.
काही जणही बांगलादेश सोडण्याच्या तयारीत आहेत. हे सगळे सुरू असताना शेख हसीना पंतप्रधान होत्या तेंव्हा त्यांनी देश सोडण्याच्या अगोदर नेमक्या काय घटना घडल्या याची माहितीही आता समोर आली आहे.
लष्करी अधिकाऱ्यांनी केला खुलासा
शेख हसीना यांनी देश सोडून जाण्याच्या अगोदरच्या रात्री बांगलादेश लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. लष्करप्रमुखही त्या बैठकीला हजर होते. त्यावेळी हसीना यांनी निदर्शकांवर गोळीबार करण्याचे आणि संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिल्याचे म्हटले जाते.
मात्र लष्कराच्या अधिकाऱ्यांनी हसीना यांचे हे आदेश मानण्यास स्पष्ट नकार दिला. रॉयटर या वृत्तसंस्थेने अधिकाऱ्यांच्याच हवाल्याने ही माहिती दिली आहे.
हसीना यांना पाठिंबा गमावला
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हसीना यांच्या सोबत बैठक झाल्यानंतर बांगलादेशचे लष्करप्रमुख वकार उज जमान यांनी लष्करातील आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्या सगळ्यांनाही गोळीबाराचा आदेश अमान्य होता.
त्यामुळे हसीना यांनी त्याचवेळी लष्कराचा त्यांना असलेला पाठिंबा गमावला होता. अर्थात हसीना यांना असलेला पाठिंबा आपण मागे घेतला आहे या निर्णयाची लष्कराने जाहीर वाच्यता केली नाही.
लष्कराने का आदेश पाळला नाही?
रॉयटरशी बोलताना लष्करातील तीन बड्या अधिकाऱ्यांनी सांगितले की देशात सुरू असलेल्या व्यापक निदर्शनांमध्ये तोपर्यंत २४१ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळेच लष्कराने हसीना असलेला पाठिंबा मागे घेतला होता.
निवृत्त ब्रिगेडिअर जनरल एम. सखावत हुसेन म्हणाले की हिंसक निदर्शने सुरू असल्यामुळे सैनिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता होती. त्या कारणामुळेही लष्करप्रमुखांवर सैनिकांचा दबाव होता. सैनिक प्रत्यक्षात खाली काम करत होते आणि देशात काय घडते आहे हे ते जवळून पाहत होते.





