Pune District : शेतकरी बाजारात दुबार विक्रेत्यांचा सुळसुळाट
Pune District : शेतकर्यांच्या म्हणण्यानुसार, बाजार सुरू होण्यापूर्वीच दुबार विक्रेते कमी किमतीत माल खरेदी करतात. त्यानंतर बाजारभाव वाढल्यानंतर तोच माल अधिक दराने विकला जातो. त्यामुळे बाजारभावावर कृत्रिम नियंत्रण निर्माण होत असून शेतकर्यांना पडत्या दराने माल विकण्याची वेळ येते.

सोरतापवाडी : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मांजरी येथील कै. अण्णासाहेब मगर उपबाजार हा ’शेतकरी ते थेट ग्राहक’ या संकल्पनेतून उभारण्यात आला. मात्र, या बाजारात दुबार विक्रेत्यांचा वाढता शिरकाव होत असल्याने मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याची गंभीर तक्रार शेतकर्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकर्यांना योग्य भाव मिळत नसून दुबार विक्रेते मात्र भरघोस नफा कमावत असल्याचा आरोप होत आहे.
शेतकर्यांनी थेट ग्राहकांना शेतमाल विकून मध्यस्थांची साखळी कमी व्हावी, या उद्देशाने हा बाजार सुरू करण्यात आला होता. मात्र, काही दुबार विक्रेते शेतकर्यांकडून कमी दरात माल खरेदी करून तोच माल ग्राहकांना अधिक दराने विकत असल्याचे चित्र दिसून येत आहे. परिणामी शेतकर्यांना अपेक्षित मोबदला मिळत नाही, तर ग्राहकांनाही थेट शेतकर्याकडून ताजा व वाजवी दरातील माल मिळण्याचा उद्देश फोल ठरत आहे. शेतकर्यांच्या म्हणण्यानुसार, बाजार सुरू होण्यापूर्वीच दुबार विक्रेते कमी किमतीत माल खरेदी करतात. त्यानंतर बाजारभाव वाढल्यानंतर तोच माल अधिक दराने विकला जातो. त्यामुळे बाजारभावावर कृत्रिम नियंत्रण निर्माण होत असून शेतकर्यांना पडत्या दराने माल विकण्याची वेळ येते. याचा थेट आर्थिक फटका उत्पादकांना बसत आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीनंतर दुबार विक्रेत्यांवर नियंत्रण येईल, अशी अपेक्षा शेतकर्यांनी व्यक्त केली होती. मात्र, प्रत्यक्षात त्यांची संख्या वाढल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. या प्रकारामुळे बाजारातील व्यवहारांची पारदर्शकता कमी झाली असून शेतकरी असंतोष व्यक्त करत आहेत. शेतकर्यांनी प्रशासनाकडे नियमित तपासणी, विक्रेत्यांची ओळख पडताळणी, नियमांचे काटेकोर पालन आणि दुबार विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ’शेतकरी ते ग्राहक’ ही संकल्पना प्रभावीपणे राबवून शेतमालाला योग्य भाव मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
ज्या मालासाठी शेतकर्यांना दीड ते पावणेदोन महिने वाट पाहून पैसे मिळतात, तोच माल दुबार विक्रेते अवघ्या दोन तासांत विकून दुप्पट-तिप्पट नफा कमावतात. ही शेतकर्यांसाठी अत्यंत दुर्दैवी बाब आहे. बाजार समितीने तातडीने दुबार विक्री बंद करून शेतकर्यांना अधिक मोबदला मिळेल, यासाठी उपाययोजना कराव्यात.
-लोकेश कानकाटे, माजी उपसरपंच, कोरेगावमूळदुबार विक्री बंद करण्यासाठी शेतकर्यांनी लेखी निवेदन द्यावे. त्यानंतर संबंधित विभागाला आवश्यक आदेश देऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल.
-प्रकाश जगताप, सभापती पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती





