ग्रामस्थांनी दिला उपोषणाचा इशारा
परिंचे- श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या ऐतिहासिक विहिरीवर अतिक्रमणे करण्यात आली आहेत. विहिरीवर काही व्यवसायीकांनी लोखंडी खांब टाकून दुकाने उभी केली आहेत. सद्यस्थिती ही विहीर बंद असून यावरील अतिक्रमणे न काढल्यास उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या बाबत गावात दोन वेळा ग्रामसभा घेण्यात आली असून अद्याप अतिक्रमणाचा तिढा सुटला नाही.
वीर ग्रामपंचायतीच्या मालकीची चवरे आळी या ठिकाणी सार्वजनिक पाणीपुरवठा करणारी विहीर आहे. दरवर्षी उन्हाळ्यात या विहिरीचे पाणी कमी पडते. या वर्षीच्या दुष्काळामध्ये विहिरीच्या पाण्याने तळ गाठल्यामुळे गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागली होती. गावापासून अवघ्या चार किलोमीटरवर दहा टी.एम.सी. क्षमतेचे वीर धरण असून धरण उशाला आणि कोरड घशाला अशी स्थिती वीर गावाची झाली आहे.
गावची लोकसंख्या वाढत असून एका विहिरीवर गावाला पाणीपुरवठा करणे शक्य नाही. गावातील मध्य भागात सर्वे नंबर 464 मध्ये प्राचीन विहीर असून या विहिरीतील गाळ काढून गावाला पिण्याच्या पाण्यासाठी याचा उपयोग करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. विहिरीवरील अतिक्रमणे न निघाल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला असून याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत यांना दिले आहे.
अतिक्रमणधारकांना ग्रामपंचायतीनी पर्यायी जागा देऊन या विहिरीवरील अतिक्रमणे हटवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अतिक्रमणधारकांनी मात्र दुकान हे आमचे उपजीविकेचे साधन असून कोणत्याही परिस्थितीत जागा सोडणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. ग्रामसभेत अतिक्रमणधारकांनी आत्मदहन करण्याचा इशारा गावाला दिला होता. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नाला प्राधान्य देऊन ग्रामपंचायतीने ऐतिहासिक विहिरीवरील अतिक्रमण तातडीने काढून विहीर पिण्याच्या पाण्यासाठी मोकळी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या विहिरीच्या पुनर्बांधणीसाठी तसेच गाळ काढण्याच्या कामासाठी लोकवर्गणी जमा करण्याची ग्रामस्थांची तयारी आहे.
- लवकरात लवकर या विषयावर मार्ग काढण्यात येईल. गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.
सरपंच माऊली वचकल, ग्रामसेवक संजय म्हेत्रे