‘मी काळजीमुळे लगेच…’, मुलाच्या अपहरणावर तानाजी सावंतांची प्रतिक्रिया
पुणे – माजी मंत्री आणि शिवसेना नेते तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत यांचे अपहरण झाल्याचा दावा केला जात आहे. सोमवारी दुपारपासून ते नॉट रिचेबल झाले आहे. ऋषिकेश सावंत हे पुणे विमानतळ परिसरातून बेपत्ता झालेत. पुणे पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारच्या सुमारास माहिती मिळाली की तानाजी सावंत यांच्या मुलाला कोणीतरी घेऊन गेले आहे. ते पुण्यावरून फ्लाईटमध्ये गेले आहेत आणि फ्लाईट आता कोणत्या देशाने चालले आहे याबाबत कन्फर्मेशन मिळवणे सुरू आहे. तसेच त्यांना परत आणण्यासाठी सर्व यंत्रणा लागली आहे. या संदर्भात किडनॅपिंगची एफआयआर दाखल करण्यात आली आहे. दरम्यान तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेत ऋषीराज सावंत यांचे अपहरण झाले नाही. तो न सांगता गेल्यामुळे आम्ही चिंताग्रस्त झाला आहोत, असे स्पष्ट केले.
तानाजी सावंत काय म्हणाले –
तानाजी सावंत म्हणाले की, माझा मुलगा ऋषीराज हा पुण्यावरुन विमानाने गेला आहे. त्याबाबत सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. परंतु तो बेपत्ता झालेला नाही किंवा त्याचे अपहरण झालेले नाही. त्याच्यासोबत त्याचे दोन मित्र आहेत. माझ्या घरातील पद्धत अशी की कोणी कुठेही गेले तरी एकमेकांना सांगून जाते. ऋषीराज मला सांगितल्याशिवाय कुठे जात नाही. परंतु तो दुपारपासून नाही. त्याने मला किंवा त्याच्या भावालाही काहीच सांगितले नाही. तसेच त्याने त्याची गाडी वापरली नाही. दुसऱ्याच्या गाडीने तो गेला आहे. त्याने फोनसुद्धा केला नाही. त्यामुळे तो पुणे विमानतळावर कसा गेला? हा प्रश्न आम्हा कुटुंबियांना पडला. मुलासाठी आम्ही चिंताग्रस्त झाल्यामुळे पोलिसांना कळवले आणि तपास सुरु झाला आहे.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत मुलाचे अपहरण झाल्याचा निनावी फोन पुणे पोलिसांच्या कंट्रोल रुमला आला. त्यानंतर पोलिसांची एकच धावपळ सुरू झाली. पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून आलेल्या 4 अज्ञात व्यक्तींनी सिंहगड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील नऱ्हे परिसरातून सायंकाळी 4.57 मिनिटांनी त्यांचे अपहरण केल्याची माहिती आहे. पोलिस या प्रकरणी ऋषिकेश सावंत यांचे कॉल रेकॉर्ड तपासून पाहत आहेत. तसेच या प्रकरणी कथित अपहरण झालेल्या घटनास्थळावरील सीसीटीव्ही फूटेजही खंगाळले जात आहे.




