झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवाचे दु:ख पाकिस्तानच्या माजी खेळाडूंना पचवता आलेले नाही. महत्वाच्या सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानचा १ धावेने पराभव केला. या पराभवानंतर टी-२० विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तान संघाचे आव्हान संपुष्टात आल्याचे दिसत आहे. पाकिस्तानच्या पराभवामुळे माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर ( Shoaib Akhtar ) चांगलाच चिडलेला दिसत होता. त्याने त्याच्या युट्युब चॅनेलवर बोलताना पाकिस्तानी संघ आणि मॅनेजमेंटवर जोरदार टीका केली आहे. यावेळी बोलताना त्याने भारताची खोड काढण्याचाही प्रयत्न केला.
“अब लोग हंस रहे है…”, पाकिस्तानच्या पराभवानंतर शोएब अख्तरचा व्हिडिओ तुफान व्हायरल
शोएब अख्तरने ( Shoaib Akhtar ) पाकिस्तानी संघाचे प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याचबरोबर भारताबाबत टिप्पणी करताना अख्तरने म्हटले की, “मी याआधीही सांगितले होते की, पाकिस्तान या आठवड्यातच मायदेशी परत येईल आणि भारत पुढच्या आठवड्यात परत येईल. उपांत्य फेरी खेळून भारतही परत येईल. कारण भारत पण काही तीस मार खान नाही.”
गुरुवारी पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात झिम्बाब्वेच्या अष्टपैलू सिकंदर रझाने दमदार कामगिरी केली. रझाने त्याच्या एकाच षटकात २ फलंदाजांना तंबूत पाठवले. त्यानंतर मात्र पाकिस्तानच्या फलंदाजीला खिंडार पडले. रझाने शादाब खान, हैदर अलीला आणि शान मसूद अशा प्रमुख फलंदाजांना बाद केले.
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने २० षटकात ८ गडी गमावत १३० धावा केल्या होत्या. मात्र प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या संघाने २० षटकात ८ बाद १२९ धावा केल्या. शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानला ३ धावांची गरज होती. मात्र त्यांना एकाच धाव घेता आली आणि झिम्बाब्वेने हा सामना १ धावेने जिंकला. सामन्यातील अष्टपैलू कामगिरीसाठी सिकंदर रझाला सामनावीर म्हणून पुरस्कार देण्यात आला.