‘जर ‘या’ खेळाडूला लवकर बाद केलं, तर भारताचा खेळ खल्लास’, IND vs PAK फायनलपूर्वी शोएब अख्तरचा पाकिस्तानला कानमंत्र

बांगलादेशला हरवत पाकिस्तान अंतिम फेरीत –
पाकिस्तानने सुपर फोर टप्प्यातील सामन्यात बांगलादेशला पराभूत करत अंतिम फेरी गाठली. पाकिस्तानच्या फलंदाजीचा फॉर्म या स्पर्धेत निराशाजनक राहिला आहे, परंतु गोलंदाजांच्या जोरावर संघाने अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. शोएब अख्तर भारताच्या वर्चस्वाची पूर्ण जाणीव ठेवून आहे. त्यामुळे त्याने पाकिस्तानी खेळाडूंना मानसिकता बदलण्याचा आणि भारताचे वर्चस्व मोडून काढण्याचा सल्ला दिला आहे.
‘मानसिकता बदला, भारताचे वर्चस्व मोडा’ –
एका कार्यक्रमात बोलताना शोएब अख्तर म्हणाला, “भारताच्या वर्चस्वाच्या मानसिकतेतून बाहेर पडा. त्यांचे वर्चस्व बाजूला ठेवा आणि ते मोडून काढा. बांगलादेशविरुद्ध दाखवलेली तीच मानसिकता अंतिम सामन्यात ठेवा. तुम्हाला 20 षटके गोलंदाजी करण्याची गरज नाही, फक्त विकेट्स घ्या.” शोएब अख्तरला वाटते की, पाकिस्तानने या स्पर्धेत अप्रतिम फॉर्ममध्ये असलेल्या अभिषेक शर्मावर लक्ष केंद्रित करावे. कारण तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.
हेही वाचा – IND vs PAK : रौफ-फरहानवर ICC च्या कारवाईची टांगती तलवार, सूर्यकुमार यादवला दिलासा
‘अभिषेक शर्मावर लक्ष केंद्रित करा’ –
शोएब अख्तर पुढे म्हणाला, “माझे हे शब्द लक्षात ठेवा, जर अभिषेक शर्मा पहिल्या दोन षटकांत बाद झाला, तर भारतीय संघ अडचणीत येईल. त्याला मिळणारी चांगली सुरुवात थांबवली, तर भारताला धावांसाठी संघर्ष करावा लागेल. अभिषेक चुकीचा फटका खेळणार नाही, असे नाही. तुम्हाला फक्त पूर्ण प्रयत्न करायचे आहेत. जर तुम्ही ठामपणे खेळलात, तर भारताला धावा करण्यासाठी कठोर मेहनत करावी लागेल.”
हेही वाचा – IND vs PAK : आयसीसीने रौफवर केली कारवाई! फरहानने शिक्षेपासून वाचण्यासाठी घेतलं धोनी-कोहलीचं नाव
माजी गोलंदाज पुढे म्हणाला, “मी गौतम गंभीरला ओळखतो. तो आपल्या संघाला सांगतो की, पाकिस्तानविरुद्ध तुम्हाला सर्वोत्तम खेळ दाखवावा लागेल. पाकिस्तान कदाचित सर्वात वाईट क्रिकेट खेळेल, सर्वात वाईट संघ निवडेल, पण अंतिम सामन्यात पोहोचताच तो सर्वोत्तम क्रिकेट खेळेल आणि विजय मिळवेल. असं अनेकदा आमच्यासोबत घडलं आहे.” या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे.





