NCP Ajit Pawar : सूरज चव्हाणांच्या पुनर्वसनाने राष्ट्रवादीत वादाची ठिणगी; सुनील तटकरेंच्या कार्यशैलीवर नेत्यांचा आक्षेप

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सूरज चव्हाण यांच्या राजकीय पुनर्वसनामुळे अंतर्गत वादाची ठिणगी पडली आहे. लातूर येथील छावा संघटनेतील कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी सूरज चव्हाण यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्यात आले होते. मात्र, अवघ्या एका महिन्यातच त्यांची पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या निर्णयाने पक्षातील मोठा गट नाराज झाला असून, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यशैलीवर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे अजित पवार समर्थक आणि तटकरे समर्थक यांच्यात सुप्त संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे.
जुलै 2025 मध्ये लातूर येथे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांनी राज्याचे तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करताना सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत खेळाचे पत्ते फेकले होते. यामुळे संतप्त झालेल्या सूरज चव्हाण आणि त्यांच्या समर्थकांनी घाडगे यांच्यावर हल्ला केला होता. या घटनेनंतर अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांना युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून तातडीने राजीनामा देण्याचे निर्देश दिले होते.
मात्र, 14 ऑगस्ट 2025 रोजी सूरज चव्हाण यांना पक्षाचे प्रदेश सरचिटणीस म्हणून नियुक्त करण्यात आले. ही नियुक्ती सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, आदिती तटकरे, नवाब मलिक आणि समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत जाहीर झाली. या निर्णयाने पक्षातील दुसऱ्या फळीतील नेते आणि काही फ्रंटल सेलचे अध्यक्ष नाराज झाले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही यावर तीव्र टीका करत, “हाणामारी करणाऱ्या व्यक्तीला उपमुख्यमंत्र्यांनी पक्षाचा सरचिटणीस बनवले, हा कसला सुशासनाचा नमुना?” अशी खोचक टीका केली.
सुनील तटकरे यांच्या कार्यशैलीवर नाराजी
सूरज चव्हाण यांच्या त्वरित पुनर्वसनामुळे पक्षातील अजित पवार समर्थक गटाने सुनील तटकरे यांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेतला आहे. तटकरे अनेक निर्णयांमध्ये पक्षातील नेत्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप आहे. यापूर्वीही पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवरून काही नेत्यांनी अजित पवारांकडे तक्रारी केल्या होत्या.
सूरज चव्हाण यांच्या नियुक्तीमुळे मराठवाड्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला फटका बसण्याची भीती नाराज गटाला आहे, कारण छावा संघटना मराठवाड्यात प्रभावी आहे.
दरम्यान, पक्षातील दुसऱ्या फळीतील नेत्यांनी आपली नाराजी थेट अजित पवार यांच्याकडे व्यक्त केली आहे. यामुळे पक्षात सुप्त संघर्ष उफाळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी 2023 मध्ये राष्ट्रवादीच्या फुटीवेळी शरद पवार यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना “पक्षविरोधी” कारवायांसाठी बडतर्फ केले होते, तर अजित पवार गटाने जयंत पाटील यांना हटवून नव्या नियुक्त्या केल्या होत्या. ही पार्श्वभूमी पाहता, पक्षातील अंतर्गत गटबाजी आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.





