मुंबई : आपले हिंदुत्व कळल्यामुळे मुसलमान आपल्यासोबत आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसेच ख्रिश्चन धर्मगुरू देखील आपल्याकडे येऊन पाठिंब्याचे पत्र दिले असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आता केवळ एक दिवस बाकी असताना उद्धव ठाकरे यांनी हे विधान केले आहे. आता कोणाला दंगली नको, किती काळ हे करत राहणार…एकत्र आलो तर आपण जगातील सर्वांत प्रसिद्ध राज्य म्हणून पुढे येऊ, असेही ठाकरे म्हणाले. ठाकरेंनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचेही आभार मानले आहेत. पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, गुजरातमधून 90 हजार लोक इथे बोलावले आहेत. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राचे कल्याण करण्यासाठी नाही तर महाराष्ट्र बळकवण्यासाठी आले आहेत. इथल्या भाजपच्या लोकांवर तुमचा विश्वास नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, माझी तब्येत सोडा महाराष्ट्राची तब्येत चांगली राहिली पाहिजे. यावेळी जर मत फुटले तर नशीब फुटेल आणि हे सगळे आपल्या डोक्यावर बसतील. मुंबईतून मराठी माणूस बाहेर गेला. पण शिवसेना आणि मराठी माणूस हे कोणी तोडणार नाही. कोस्टल रोडचे वचन शिवसेनेने दिलेले होते आणि ते पूर्ण देखील केले आहे. आता हे फिती कापायला येतात, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. आता हे लोक चर्चा करतात की उद्धव ठाकरेंनी त्यांचे सरकार असताना पूर्ण वेळ काम करण्यास यायला पाहिजे होते. बटेंगे तो कटेंगे असे म्हणत आहेत. पण, मी मुख्यमंत्री असताना कोणाची हिंमत नव्हती, असेही ठाकरे म्हणाले.