मुंबई – विक्रमादि्त्य सुनील गावसकर यांना पुन्हा एकदा लोकेश राहुलबाबत कळवळा आला आहे. आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघात राहुलचा समावेश करावा असे सांगतानाच त्यांनी यष्टीरक्षक फलंदाज श्रीकर भरतला वगळण्याची मागणी केली आहे.
गेल्या कित्येक काळापासून राहुल सतत अपयशी ठरत आहे. त्यामुळे त्याचे उपकर्णधारपदी काढून घेतले गेले. मात्र, गावसकर यांच्या मते या अंतिम लढतीत तो भारतासाठी लाभदायक ठरेल. राहुलकडे भरतपेक्षा जास्त अनुभव आहे. तसेच राहुलला ऑस्ट्रेलियाविरुद्ध तसेच इंग्लंडमध्येही खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या अंतिम लढतीसाठी संघ निवडताना भरतच्या जागी राहुलचा समावेश जास्त लाभदायक ठरेल, असेही गावसकर यांनी म्हटले आहे.
भारताला जर विजेतेपद मिळवायचे असेल तर संघात केवळ एक बदल केला तरीही यश मिळेल. राहुलचा संघात समावेश करत भरतला वगळा व हाच बदल संघाच्या यशात सर्वात मोठा मुद्दा ठरेल. हा अंतिम सामना इंग्लंडमध्ये होत आहे, त्यामुळे साहजीकच एक वेगवान गोलंदाज जादा खेळवावा लागेल अशा स्थितीत राहुल संघात असेल तर वेगळा यष्टीरक्षक खेळवण्याची गरज भासणार नाही. तसेच राहुल सातत्याने सलामीला अपयशी ठरत अहे तर त्याला पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर खेळवले गेले तरही योग्य ठरेल, असेही गावसकर म्हणाले.
#TeamIndia : काही प्रमुख खेळाडूंना सातत्याने विश्रांती देण्याची भानगड काय ? गावसकरांचा संतप्त सवाल
कायम पाठीशी…
गावसकर यांनी राहुलबाबत केलेले हे पहिले वक्तव्य नसून यापूर्वीही अनेकदा त्यांनी राहुलला पाठींबा दिलेला आहे. त्याला सातत्याने अपयश येत असतानाही ते त्याला संघातून वगळण्याच्या विरोधातच होते. विराट कोहली अपयशी ठरत असताना त्याला संघातून बाहेर काढा अशी मागणी करणारे गावसकर राहुलच्या बाबतीत ही भूमीका का घेतात याबाबतही अनेकांनी सवाल केला आहे. अर्थात गावसकर यांनी याबाबत कधीही प्रतिक्रीया दिलेली नाही.