Student Safety – विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या मानसिक आणि भावनिक आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड महापालिकेने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. महापालिकेच्या शाळांमध्ये आता आधुनिक सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली असून विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, विश्वासार्ह आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महापालिकेच्या प्रत्येक शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. शाळेचे व्हरांडे, पॅसेज, स्टेअर केस, प्रवेशद्वार तसेच वॉशरूमच्या बाहेरील परिसर अशा सर्व महत्त्वाच्या ठिकाणी कॅमेरे कार्यरत करण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे शक्य होत असून कोणतीही अनुचित घटना घडल्यास तत्काळ कारवाई करणे सुलभ झाले आहे. या उपक्रमामुळे पालकांमध्येही मोठ्या प्रमाणात विश्वास निर्माण झाला आहे. याशिवाय शाळांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची महापालिकेकडून सखोल तपासणी करण्यात येते. शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांचे पोलिस व्हेरिफिकेशन अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच मानधन कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, सिक्युरिटी गार्ड, सफाई कर्मचारी अशा बाहेरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही संबंधित संस्थांमार्फत पोलिस पडताळणी केली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही तडजोड केली जात नाही. पिंपरी चिंचवड महापालिका. मुलींच्या सुरक्षिततेसाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी दामिनी पथकाच्या माध्यमातून विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येते. या सत्रांमध्ये स्वसंरक्षण, सायबर सुरक्षा, कायदेशीर हक्क, चुकीच्या स्पर्शाची ओळख आणि संकटसमयी कसे वागावे याबाबत मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे विद्यार्थिनी अधिक जागरूक आणि सक्षम होत आहेत. महापालिकेने राबवलेल्या या विविध उपक्रमांमुळे शाळांमध्ये सुरक्षित आणि संवेदनशील वातावरण निर्माण होत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळत आहे. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची आणि मानसिक स्वास्थ्याची घेतलेली ही काळजी निश्चितच कौतुकास्पद मानली जात आहे. व्यक्त होताहेत विद्यार्थी फक्त भौतिक सुरक्षिततेपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यालाही महापालिकेने तितकेच महत्त्व दिले आहे. महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये मिळून एकूण ३२ समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येकी तीन शाळांमागे एक समुपदेशक या पद्धतीने ही व्यवस्था उभारण्यात आली आहे. हे समुपदेशक दर आठवड्याला शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. काही वेळा गटांमध्ये तर काही वेळा वैयक्तिक पातळीवर विद्यार्थ्यांशी चर्चा केली जाते. अनेक विद्यार्थी विविध कारणांमुळे आपल्या भावना किंवा समस्या आई-वडील, शिक्षक किंवा मित्रांपुढे मांडू शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांना समुपदेशकांशी मोकळेपणाने बोलण्याची संधी मिळत आहे. शैक्षणिक ताण, मानसिक दबाव, घरातील समस्या, मैत्रीतील अडचणी किंवा भावनिक तणाव अशा अनेक विषयांवर विद्यार्थी समुपदेशकांकडे व्यक्त होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढण्यास आणि मानसिक स्वास्थ्य सुधारण्यास मदत होत असल्याचे दिसून येत आहे.