Yogi Adityanath : “भाषेच्या वादाला खतपाणी घालणारी राज्ये मागे पडत आहेत”; CM योगींचा स्टॅलिन यांना खोचक टोला

Yogi Adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाषेवरून होणाऱ्या राजकारणावर टीका केली आहे. ज्या राज्यांचे नेते या वादाला खतपाणी घालत आहेत ती राज्ये मागे पडत आहेत असा दावा त्यांनी केला आहे.
एका मुलाखतीत योगी म्हणाले, उत्तर प्रदेशात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत, नोकऱ्या निर्माण होत आहेत. भाषेवरून वाद निर्माण करणारे कदाचित त्यांचे राजकीय हितसंबंध पूर्ण करत असतील पण एक प्रकारे ते तरुणांच्या रोजगाराच्या संधींवर हल्ला करत आहेत.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांना भेटणार का असे विचारले असता. स्टॅलिन यांचा उल्लेख करत ते म्हणाले, ते कोणीही असोत, तेही तेच करत आहेत. यामुळेच ही राज्ये हळूहळू मागे पडत आहेत. त्यांच्याकडे दुसरा कोणताही मुद्दा नाही आणि ते त्यांचे राजकीय हितसंबंध साध्य करण्यासाठी भावना भडकावत आहेत.
योगी म्हणाले की, तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड, बंगाली किंवा मराठी यासारख्या भाषा राष्ट्रीय एकतेचा पाया बनू शकतात. उत्तर प्रदेश सरकार आपल्या विद्यार्थ्यांना तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड, बंगाली आणि मराठी यासारख्या भाषा शिकवत आहे. यामुळे उत्तर प्रदेश कोणत्याही अर्थाने लहान झाला का? यामुळे उत्तर प्रदेश कमकुवत होतो का?
मुख्यमंत्री म्हणाले की, हिंदीचा आदर केला पाहिजे असे सर्वांचे मत आहे परंतु भारताने त्रिभाषा सूत्र स्वीकारले आहे. हे त्रिभाषिक सूत्र प्रादेशिक भाषांनाही समान आदर मिळावा याची खात्री देते. प्रत्येक भाषेची स्वतःची खासियत असते जी राष्ट्रीय एकात्मतेचा पाया बनते.
प्रत्येक प्रादेशिक भाषेच्या स्वतःच्या लोक परंपरा आणि कथा असतात ज्या राष्ट्राची विविधता बाहेर आणतात आणि ती अधिक मजबूत करतात. काशी तमिळ संगमम उपक्रम हे याचे सर्वोत्तम उदाहरण आहे कारण ते भारतातील सर्वात जुन्या भाषा तमिळ आणि संस्कृतला एकत्र आणते.





