- परस्पर करताहेत किराणा दुकाने बंद; नागरिकांचे हाल
पिंपरी – महापालिका आयुक्तांनी तीन दिवस भाजी विक्री बंद करण्याचे आदेश काढले आहेत. मात्र किराणा दुकाने बंद करण्याचे कोणतेही आदेश नाहीत. मात्र नगरसेवक दुकानदारांना दादागिरी करीत दुकाने बंद ठेवण्यास भाग पाडत आहेत. यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
गर्दी कमी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 24 तास दुकाने सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे. तर करोनाचा प्रसार रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तीन दिवस भाजी आणि फळ विक्रीवर पूर्णपणे बंदी आणली आहे. मात्र नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून किराणा दुकाने बंद करण्याचे कोणतेही आदेश दिलेले नाहीत. मात्र काही ठिकाणी स्थानिक नगरसेवक दुपारी बारा वाजेपर्यंत तर काही ठिकाणी दुपारी 12 ते 4 दरम्यान दुकाने सुरू ठेवण्यास भाग पाडत आहेत. यामुळे जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी सकाळी नागरिकांची गर्दी पहायला मिळत आहे.
दुधासाठी वणवण
किराणा दुकान उघडताना माल लावण्यात दुकानदारांचा एक ते दीड तासांचा वेळ जातो. पुन्हा दुकान बंद करण्यासाठी तेवढाच वेळ जातो. यामुळे काही दुकानदारांनी दुकाने बंद ठवेली आहे. तर काहीजण सकाळी फक्त दूध विक्री करतात. मात्र फक्त दुधाच्या व्यवसायाकरिता का यायचे म्हणून काहींनी दूध विक्रीही बंद केली आहे. यामुळे नागरिकांना दुधासाठी वणवण भटकावे लागत आहे. सोमवारी सकाळी दुधाची टंचाई प्रकर्षाने जाणवली. “स्वीट मार्ट’ हे मोठ्या प्रमाणात दुधाची खरेदी-विक्री करतात. परंतु सध्या स्वीट मार्ट बंद असल्यामुळे डेयरी आणि लहान दुकानदारांवरच दुधाचा पुरवठा करण्याची भिस्त आहे. त्यात डेयरी चालक हे ब्रांडेड डेयऱ्यांचे दूध न विकता जास्त फायद्यासाठी नवनवीन ब्रांडचे आणि अतिशय पातळ दूध विकत असल्याची तक्रार ही नागरिक करत आहेत.
कारवाई करणार कोण?
स्थानिक नगरसेवकाशी वैर नको, म्हणून किराणा दुकानदार पोलिसात तक्रार करीत नाहीत. तर दुसरीकडे नगरसेवकांची दादागिरी कानावर येऊनही पोलीस तक्रारदार नसल्याचे कारण सांगत त्या नगरसेवकांच्या विरोधात कोणतीही कारवाई करीत नाहीत. शहराच्या विविध भागात नगरसेवकाच्या दादागिरीचे चित्र पहायला मिळत आहे. दिवसेंदिवस नगरसेवकांची दादागिरी वाढत चालली असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत.
लपून-छुपून भाजी विक्री
एकीकडे नगरसेवक दादागिरी किराणा दुकाने बंद करीत आहेत. तर दुसरीकडे फळ आणि भाजी विक्रेते सकाळच्यावेळी चोरून लपून आपला व्यवसाय करीत असल्याचे दिसून येत आहे. मात्र यावेळी पोलिसांची ड्यूटी बदली होण्याची वेळ असल्याने पोलिसांची गस्त नसते. याचाच फायदा भाजी आणि फळ विक्रेते घेताना दिसत आहेत.