Shivendrasinhraje Bhosale : कागदी घोडे नाचवणं थांबवा, अन्यथा…; पाणीप्रश्नावरून शिवेंद्रसिंहराजेंचा अधिकाऱ्यांना कडक इशारा
Shivendrasinhraje Bhosale : साताऱ्यातील पाणीटंचाई मिटवण्यासाठी मंत्री शिवेंद्रसिंहराजेंनी अधिकाऱ्यांना भर बैठकीतच सुनावले खडेबोल.

Shivendrasinhraje Bhosale – सातारा तालुक्यातील पाणीटंचाईचा प्रश्न केवळ बैठकीतल्या चर्चांपुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कामातून सोडवावा, असा कडक इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अधिकाऱ्यांना दिला. ‘पाणी योजना फक्त कागदावर नकोत; कामे प्रत्यक्षात पूर्ण झाली पाहिजेत, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल,’ अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी दम भरला.
शासकीय विश्रामगृहात झालेल्या टंचाई आढावा बैठकीत मंत्री भोसले यांनी प्रशासनाच्या ढिसाळ कामकाजावर नाराजी व्यक्त करत प्रलंबित पाणी योजनांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले. ‘अधिकारी फक्त अहवाल देऊन मोकळे होऊ नयेत; गावोगावी फिरून वास्तव परिस्थिती समजून घ्यावी आणि नागरिकांच्या अडचणी तत्काळ सोडवाव्यात,’ असे त्यांनी ठणकावून सांगितले.
गणेशवाडी, दत्तवाडी येथील विंधन विहिरींची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश देताना, जलजीवन मिशनअंतर्गत अपूर्ण कामांवरही त्यांनी बोट ठेवले. ‘७० टक्के कामे रखडलेली असताना टंचाई नाही असे कसे म्हणता? आधी प्रलंबित कामे पूर्ण करा, मगच नवीन योजना हाती घ्या,’ असेही त्यांनी सुनावले.
उरमोडी व कण्हेर धरणातून पिण्यासाठी पाणी सोडण्याचे आणि ठरलेल्या रोटेशनचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देत, ‘तालुक्यात एकाही गावात टँकरची वेळ येऊ नये, असे नियोजन करा,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘पिण्याच्या पाण्याशी खेळ, सहन केला जाणार नाही’
बैठकीत लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या तक्रारींवरून प्राधिकरणाच्या कामकाजावर संताप व्यक्त करत मंत्री भोसले म्हणाले, ‘विलासपूर, शाहूनगर, शाहूपुरी, खिंडवाडी, संभाजीनगर, सायगाव येथे पाणीटंचाई आणि दूषित पाणीपुरवठा होत असेल, तर ही प्रशासनाची अपयशाची कबुली आहे.’
अतिक्रमणांमुळे कामे अडत असतील तर पोलिस आणि पालिकेची मदत घेऊन तातडीने कारवाई करा, असा आदेशही त्यांनी दिला. महावितरण आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचे स्पष्ट करत, ‘नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याशी खेळ सहन केला जाणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले.





