Shivsena Vs BJP : फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातील जिल्हा परिषद निवडणुका (Shivsena Vs BJP) पार पडल्या. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या राजकीय समीकरणांचे चित्र दिसले. यापैकी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत भाजपने २३ जागा जिंकल्या, तर एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेने २१ जागांवर विजय मिळवला. या दोन्ही पक्षांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदावर दावा सांगितला होता. दोघांमध्ये जागांची (Shivsena Vs BJP) जुळवाजुळव सुरू असतानाच अखेर भाजपने एकट्याने अध्यक्षपद ताब्यात घेतले. अध्यक्षपदी भाजपचे अविनाश गलांडे तर उपाध्यक्षपदी जितेंद्र जैस्वाल यांची निवड झाली. या निवडणुकीला शिंदे गटाच्या शिवसेनेसह उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेनेही बहिष्कार टाकला होता. ‘आम्ही शिवसेनेला उपाध्यक्षपद देणार होतो’ – अतुल सावे निवडणुकीनंतर भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी माध्यमांशी बोलताना खळबळजनक खुलासा केला. त्यांनी सांगितले की, भाजप-शिवसेना युतीची बैठक झाली होती. या बैठकीला पालकमंत्री संजय शिरसाठ आणि संबंधित आमदार उपस्थित होते. बैठकीत ठरले होते की, पहिले अडीच वर्ष भाजपचा अध्यक्ष आणि शिवसेनेचा उपाध्यक्ष, तर पुढील अडीच वर्ष शिवसेनेचा अध्यक्ष आणि भाजपचा उपाध्यक्ष. मात्र अचानक काय घडले ते माहिती नाही. तीन दिवस अगोदरच माहिती मिळाली की, शिवसेना आपल्या पुरस्कृत उमेदवारांना फोन करून ‘वेगळे सरकार बनवणार आहोत’ असे सांगत होती. अपक्ष उमेदवारांनाही फोन केले गेले. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ने भाजपला पाठिंबा जाहीर केला असतानाही शिवसेना त्यांना संपर्क करत होती. Shivsena Vs BJP सावे म्हणाले, “मी पालकमंत्र्यांना विचारले तेव्हा त्यांनी ‘मला काहीच माहिती नाही’ असे सांगितले. त्यावेळी आम्हाला समजले की ते दुसऱ्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे आम्ही आपले गणित जुळवण्यास सुरुवात केली. आमच्याकडे २३ + २ पुरस्कृत सदस्य होते. एक उमेदवार आमच्याकडे आला, दुसऱ्याने पाठिंबा दिला. त्यामुळे २७ मते झाली. राष्ट्रवादीचा पाठिंबा होता, त्यामुळे फक्त एक मत बहुमतासाठी पुरेसे होते.” शिंदे-ठाकरे गट एकत्र आले, तरी बहुमत गाठता आले नाही अतुल सावे पुढे म्हणाले, “शिवसेनेने उद्धव ठाकरे गटाला सोबत घेतले, पण त्यांना लक्षात आले की त्यांचे गणित बसत नाही. त्यांचे दुर्भाग्य असे की, जे ठाकरे गटाचे लोक सोबत आले होते, त्यातले काही लोक पळून गेले. आम्ही त्यांना उपाध्यक्षपद देणार होतो, ते त्यांनी स्वीकारायला हवे होते. सकाळपर्यंत आम्ही वाट पाहिली. ते आले नाहीत, आम्हाला फोनही केला नाही. त्यांना सकाळपर्यंत विश्वास होता की त्यांचे गणित जमले आहे. दोन आमदारांना आपल्या नातेवाईकांना अध्यक्ष करायचे होते, म्हणून त्यांनी एकनाथ शिंदेंना चुकीची माहिती दिली. पण तो आकडा त्यांना जमवता आला नाही. आम्हाला बहुमताचा आकडा गाठता आला.” अब्दुल सत्तारांवर जोरदार टीका अतुल सावे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर थेट आरोप केला. ते म्हणाले, “आम्ही कोणताही विश्वासघात केला नाही. अब्दुल सत्तार यांना उपाध्यक्षपद मी स्वतः देणार होतो. सकाळपर्यंत ते आले असते तर आम्ही दिले असते. आता अब्दुल सत्तार यांना सांगा तुम्ही तुमचा मतदारसंघ सांभाळा. तुमच्या मतदारसंघात ५० टक्के भाजप आलेला आहे. तुमच्या मुलाला अध्यक्ष करायचे होते म्हणून तुम्ही युती तोडण्याचा प्रयत्न केला. तुम्ही ठाकरे सेनेच्या लोकांना बाहेर घेऊन गेलात.” ‘केसाने गळा कापला…’ – अब्दुल सत्तारांचा आरोप दुसरीकडे, अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना भाजपवर विश्वासघाताचा गंभीर आरोप केला. ते म्हणाले, “वरिष्ठ नेत्यांमध्ये उदय सामंत यांच्याशी चर्चा झाली होती. अशा प्रकारचा विश्वासघात पहिल्यांदाच पाहायला मिळाला. अध्यक्ष महोदयांनी ‘अध्यक्षपद देऊ’ असे सांगितले, त्यानुसार आम्ही कामाला लागलो. पण केसाने गळा कापला असं म्हणावं लागेल. पुढचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील.” सत्तार यांनी पुढे सांगितले, “उबाठा (उद्धव ठाकरे) सोबत कोण गेले हे तुम्ही माहिती काढू शकता. या प्रक्रियेत विलास बापू आणि निरीक्षक होते. उद्धव ठाकरेंच्या सदस्यांना भाजपच्या नेत्यांनी सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशी आर्थिक व्यवहार करण्याचा प्रयत्नही झाला,” असा गंभीर आरोप सत्तार यांनी केला. या प्रकरणाने छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत भाजप-शिवसेना (Shivsena Vs BJP) युतीत मोठी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. युतीची बैठक ठरलेल्या सूत्रानुसार चालली असती तर दोन्ही पक्षांना वाटणी मिळाली असती, मात्र अखेर भाजपने एकट्याने अध्यक्षपद काबीज केले. आता दोन्ही बाजू एकमेकांवर विश्वासघाताचे आरोप करत असल्याने पुढील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.