बारामती – चिन्हाची फार चिंता करायची नाही, आजपर्यंत मी 14 वेळा निवडणुका लढलो. त्यापैकी पाच निवडणुकांचे चिन्ह हे बैलजोडी, गाय वासरू, चरखा, हाताचा पंजा व घड्याळ अशी होती. मात्र चिन्ह काढून घेतलं म्हणजे त्या संघटनेचा अस्तित्व संपेल, असे कधी घडत नाही. वेगवेगळ्या चिन्हावर लढवून देखील मी निवडून आलो. तुम्ही लोकांच्यात जावा यश नक्की मिळेल असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट केले.
माळशिरस तालुक्यातील काही कार्यकर्त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. यावेळी गोविंद बागेत त्यांच्याशी संवाद साधताना पवार बोलत होते. देशात यापूर्वी जे झालं नाही ते राष्ट्रवादीत झालं. पक्ष स्थापन करणाऱ्या कडूनच पक्ष काढून घेतला गेला. मात्र याने अस्तित्व संपत नसतं. न्यायालयात योग्य न्याय मिळेल असे पवार म्हणाले. समंद माणूस केंद्रबिंदू ठेवून जनसंपर्क वाढवणे गरजेचे आहे. जनतेचा विचार होणे गरजेचे आहे. याबाबत महाराष्ट्रभर फिरणार असून लोकांशी संपर्क साधणार असल्याचे पवार यांनी सांगितले. सध्या घडत असलेल्या घडामोडीमुळे कोणती अडचण येईल असे वाटत नाही असे पवार यांनी स्पष्ट केले.