मागील काही दिवसांपासून संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकांचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र यांचा गड मानला जाणाऱ्या गुजरातेत भाजपला मोठ विजय मिळवण्यात आलय. तर दुसरीकडे भाजपला सत्तेत असताना देखील हिमाचल प्रदेशात पराभव स्वीकारावा लागला आहे. या दोन्ही निवडणुकांचे अंतिम निकाल आलेले नाहीत, मात्र आत्तापर्यंतच्या समोर आलेल्या आकडेवारीनुसार गुजरातेत भाजप १८२ जागांपैकी १५८ ठिकाणी विजय मिळवणार आहे. तर हिमाचल प्रदेशात ६८ जागांपैकी ४० ठिकाणी काँग्रेस विजयी होणार असल्याचे दिसत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुजरातच्या निकालाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
गुजरातमध्ये विजय मिळवण्यासाठी केंद्राकडून पूर्ण ताकद लावण्यात आली आहे. या ठिकाणी भाजपला जरी मोठे यश मिळाले असले तरी देशातील जनतेचा मतप्रवाह एकाच दिशेने जातोय असे अजिबात नाही. असे गुजरातच्या निकालाबद्दल बोलताना शरद पवार यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्रातून गुजरातकडे गेलेल्या मोठ्या प्रकल्पाचाही उल्लेख करत भाजपवर टीका केली आहे.
“गुजरातमध्ये भाजपचा एकतर्फी विजय होईल याबाबत कोणाच्याही मनात शंका नव्हतीच. कारण त्यांच्याकडून या निवडणुकीसाठी केंद्रातील संपूर्ण ताकद वापरण्यात आलेली होती. त्याचबरोबर एकाच राज्याचे सोईचे निर्णय आणि त्याच राज्यात अनेक प्रकल्प कसे जातील, याचे खास नियोजन भाजपकडून करण्यात आले होते. या सगळ्या गोष्टींचा परिणाम थेट निकालावर झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. गुजरातेत भाजपला मोठं यश नक्कीच मिळालाय, मात्र संपूर्ण देशाचा मतप्रवाह एकाच बाजूला जातोय असे अजिबात नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे दिल्लीतील महापालिका निवडणूक आहेत”, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.
“गुजरातेत भाजपला विजय मिळालाय मात्र, दिल्ली महापालिकेत आणि हिमाचल प्रदेशात भाजपची सत्ता होती. या दोन्ही ठिकाणी सत्तेवर असतानाही भाजपला पराभव मिळालाय. दिल्ली महापालिकेत आम आदमी पार्टी तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने भाजपला सत्तेवरून खाली खेचले आहे. या दोन्ही ठिकाणचा भाजपचा पराभव म्हणजे हळूहळू बदल घडत आहेत. राजकीय पोकळीला कोणता ना कोणता पक्ष भरून काढत असतो. ज्याप्रमाणे गुजरातची पोकळी भाजपने तर दिल्लीतील पोकळी आम आदमी पार्टीने भरून काढली आहे. त्यामुळे जनतेला आता बदल हवा आहे आणि हीच गोष्ट राजकीय कार्यकर्त्यांनी लक्षात घेतली पाहिजे”, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.