Shambhuraj Desai: सातारा पालकमंत्रिपदाचा तिढा वाढला! शंभूराज देसाईंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “मुख्यमंत्री…
Shambhuraj Desai: जिल्हा परिषद निवडणुकीवरून महायुतीत झालेल्या वादावर फडणवीसांच्या बैठकीनंतर पडदा; शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केला महायुती धर्म.

Shambhuraj Desai – सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील तो निर्णय मला मान्य असेल, असे राज्याचे पर्यटन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सोमवारी स्पष्ट केले. कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण असावा, याचा निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आहे. त्यांच्या अधिकारकक्षेबाबत भाष्य करणे मला उचित वाटत नाही, असेही ते म्हणाले.
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई यांनी ही प्रतिक्रिया दिली. पालकमंत्रिपदाबाबत सुरू असलेल्या चर्चेवर थेट भाष्य करण्याचे टाळत त्यांनी अंतिम निर्णय महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वावर सोपवला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या राजकारणावरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये झालेल्या वादावर अद्याप पडदा पडलेला नाही. त्याबाबत विचारले असता मंत्री देसाई म्हणाले,
त्यावेळी झालेल्या वादानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चेंबरमध्ये बैठक झाली होती. त्या बैठकीतील चर्चेबाबत सांगणे उचित ठरणार नाही. मात्र, त्या वादावर पडदा पडल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच बैठकीनंतर स्पष्ट केले होते. महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी दिलेल्या सूचनेनुसार आपण महायुती धर्म पाळत आहोत, असेही शंभूराज देसाई यांनी सांगितले.
जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवरुन तर्कवितर्क सुरू असले, तरी मंत्री देसाई हे महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या निर्णयानुसारच भूमिका घेणार असल्याचे या प्रतिक्रियेतून स्पष्ट झाले आहे. सातार्याचे पालकमंत्रिपद कोणाला मिळणार, याची उत्सुकता असताना, शंभूराज देसाई यांच्या सावध भूमिकेमुळे या चर्चेला आणखी वेग आला आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.





