Sayaji Shinde | Devrai Project : पालवन शिवारातील ज्या ओसाड डोंगराला हिरवेगार करण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे आणि वनविभागाने गेल्या सात वर्षांपासून अहोरात्र कष्ट घेतले, त्या ‘सह्याद्री देवराई’ प्रकल्पाला बुधवारी सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत अनेक दुर्मिळ झाडे, औषधी वनस्पती जळून खाक झाल्या असून, असंख्य पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या दुर्घटनेनंतर सयाजी शिंदे यांनी अत्यंत भावूक होत आपली नाराजी व्यक्त केली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “लोकांचा असा गैरसमज आहे की गवत जाळल्याने ते पुन्हा चांगले उगवते, पण यामुळे निसर्गाचे अपरिमित नुकसान होते. आपल्या घरावर बॉम्ब पडल्यावर जी अवस्था होते, तशीच अवस्था आज या मुक्या प्राण्यांच्या घरांची झाली आहे. २०१७ पासून अनेक हातांनी ही देवराई उभी केली होती, ती आज डोळ्यादेखत जळताना पाहणे अत्यंत क्लेशदायक आहे.”
प्रशासनाला थेट सवाल :
यावेळी सयाजी शिंदे यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांवर आणि राज्य सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. “मे-जून महिन्यात बीडमध्ये १५ लाख झाडे लावल्याचा दावा करून गिनीज वर्ल्ड बुकमध्ये नोंद करण्यात आली आणि जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कारही झाला. ती १५ लाख झाडे नक्की कुठे आहेत? जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचे उत्तर द्यावे.”
हौसेने कौतुक करून घेणाऱ्या प्रशासनाने आता या लावलेल्या झाडांचा हिशोब द्यावा. वन खाते आणि पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. जर तपोवनसारखी ठिकाणे सुरक्षित राहणार नसतील, तर नवीन झाडे लावण्यात काय अर्थ?” असं ते म्हणाले.
आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे अनेक वर्षांची मेहनत काही तासांत भस्मसात झाली. झाडांवरील घरटी, अंडी आणि पिल्ले आगीत होरपळली गेली. माझ्या जगण्याचे ध्येय १०० देवराई उभारण्याचे आहे. कितीही संकटे आली तरी मी हे स्वप्न पूर्ण करेन,” असा निर्धार सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला.
नागरिकांना आवाहन :
सयाजी शिंदे यांनी नागरिकांनाही जबाबदार राहण्याचे आवाहन केले आहे. झाडांची काळजी घेणे ही केवळ सरकारची नाही, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी निक्षून सांगितले. तसेच निसर्गाचा हा ऱ्हास केवळ एका प्रकल्पाचे नुकसान नसून ती संपूर्ण पर्यावरणाची हानी आहे. आता प्रशासन सयाजी शिंदे यांनी उपस्थित केलेल्या ‘१५ लाख झाडांच्या’ प्रश्नावर काय उत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





