Satara ZP Election : कोयनेच्या खोऱ्यात चौरंगी लढत; पाटणकरांचा बालेकिल्ला पडणार की देसाईंचा ‘बाण’ चालणार?
Satara ZP Election : हेळवाक जिल्हा परिषद गट व पंचायत समितीचे दोन गण यंदा चौरंगी राजकीय लढतीमुळे केंद्रस्थानी आले आहेत.

Satara ZP Election – विभागातील हेळवाक जिल्हा परिषद गट व पंचायत समितीचे दोन गण यंदा चौरंगी राजकीय लढतीमुळे केंद्रस्थानी आले आहेत. शिवसेना, भारतीय जनता पक्ष, ठाकरे गट आणि राष्ट्रीय काँग्रेस या चार प्रमुख राजकीय प्रवाहांचे उमेदवार रिंगणात उतरल्याने ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेपुरती न राहता कोयना विभागाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी बनली आहे.
हेळवाक जिल्हा परिषद गट व गण परंपरेने भाजपमधील पाटणकर गटाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या मतदारसंघात मताधिक्य घेतल्याने राजकीय समीकरणे बदलण्यास सुरुवात झाली. त्यानंतर रस्ते, पाणीपुरवठा, ग्रामविकास, मूलभूत सुविधा आणि विविध विकासकामांच्या जोरावर शिवसेनेने या भागात आपला गट अधिक भक्कम केला आहे.
शिवसेनेकडून अशोकराव पाटील उमेदवार असून, बंडखोरीमुळे आजपर्यंत विजयाच्या गुलालापासून वंचित राहिलेल्या शिवसेनेसाठी ही निवडणूक एकीची निर्णायक कसोटी ठरणार आहे. मागील निवडणुकांत अंतर्गत फाटाफुटीचा फटका बसलेला असताना, यावेळी पक्षाने संघटनात्मक शिस्त, कार्यकर्त्यांचे एकत्रीकरण आणि नियोजनबद्ध प्रचारावर भर दिला आहे. ही एकी प्रत्यक्ष मतदानात कितपत उतरते, यावर शिवसेनेचे भवितव्य अवलंबून आहे.
बालेकिल्ला टिकवण्याचे पाटणकर गटापुढे आव्हान
दुसरीकडे, गट टिकवण्यासाठी सत्ताधारी भाजपाच्या आश्रयाला गेलेल्या पाटणकर गटासाठी ही निवडणूक आपला बालेकिल्ला अभेद्य ठेवण्याची लिटमस टेस्ट ठरणार आहे. भाजपचे उमेदवार दत्तात्रय कदम यांच्यासमोर तिकीट वाटपातून झालेली नाराजी, अंतर्गत अस्वस्थता आणि चौरंगी लढतीमुळे होणारे मतविभाजन ही मोठी आव्हाने आहेत. परंपरागत मतपेढी, संघटन आणि सत्तेचा आधार पुरेसा ठरतो की नाही, याचा फैसला मतदार करणार आहेत.
ठाकरे गटाचा निकालावर प्रभाव
ठाकरे गटाचे उमेदवार महेश शेलार हे कोयना विभागातील धरणग्रस्तांचे प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. कोयना धरणामुळे विस्थापित झालेल्या कुटुंबांचे प्रश्न, पुनर्वसन, न्यायहक्क आणि मूलभूत सुविधांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला आहे. त्यामुळे धरणग्रस्त भागात त्यांना भावनिक पाठिंबा मिळत असून, थेट विजयापेक्षा निकालावर प्रभाव टाकणारी भूमिका त्यांची ठरण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय काँग्रेसचा आश्वासक चेहरा
राष्ट्रीय काँग्रेसकडून डॉ. संतोष कदम निवडणूक लढवत असून, ते या लढतीतील आश्वासक चेहरा मानले जात आहेत. शांत, संयमी आणि अभ्यासपूर्ण प्रचारशैली, शिक्षण, आरोग्य, युवकांचे प्रश्न आणि ग्रामीण विकास यांवर त्यांनी भर दिला आहे. सुशिक्षित, तरुण मतदारांमध्ये त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.
यंदाच्या निवडणुकीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांना एकत्र मतदान होणार असल्याने क्रॉस व्होटिंगची शक्यता लक्षणीयरीत्या वाढली आहे. त्याचा थेट परिणाम निकालावर होणार आहे. स्थानिक समीकरणे, व्यक्तिगत संबंध आणि गट-गणित यामुळे ही क्रॉस व्होटिंग कोयना विभागाच्या राजकारणात नवे संकेत देऊ शकते.





