Satara Traffic: साताऱ्यात वाहतुकीचा कोंडतोय श्वास! रस्त्यांवर ‘बेकायदेशीर मंडई’ अन् प्रशासनाचे दुर्लक्ष…पहा धक्कादायक वास्तव
Satara Traffic: तांदूळ आळी, मोळाचा ओढा आणि मार्केट यार्ड परिसरात नियमांची पायमल्ली; पोलीस व पालिकेच्या बैठकीनंतरही वाहतूक आराखड्याची अंमलबजावणी कागदावरच.

Satara Traffic – शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेला वेग आला असतानाच रस्त्यांवर थाटलेल्या भाजी मंडईंचा प्रश्न मात्र अद्याप ‘जैसे थे’ आहे. शहरातील विविध प्रमुख रस्ते, चौक आणि वाहतुकीच्या मार्गांवर सायंकाळनंतर भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण वाढत असल्याने वाहतुकीचा अक्षरशः श्वास कोंडला जात आहे. अतिक्रमण हटाव पथकाने केवळ हातगाड्या, टपऱ्या किंवा किरकोळ अतिक्रमणांपुरती मोहीम मर्यादित न ठेवता रस्ते गिळंकृत करणाऱ्या या मंडईंकडेही आता कठोरपणे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
राजवाडा बस स्थानक परिसरात सायंकाळी सातनंतर रंगणारी टेम्पो मंडई, तांदूळ आळीच्या रस्त्यावर आणि चांदणी चौकापासून नगर वाचनालयापर्यंतच्या कोपऱ्यावर रस्त्यावर बसणारे भाजी विक्रेते आणि मोळाचा ओढा ते कोंडवे या मार्गावर नव्याने वाढलेली भाजी मंडई यामुळे वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शहराची हद्द वाढली म्हणून नव्हे, तर नियोजनबद्ध हॉकर्स झोन विकसित न झाल्याने ‘गाजराच्या गवताप्रमाणे’ या मंडईंची वाढ होत असल्याचे चित्र आहे.
केवळ समज’ देऊन उपयोग काय?
मोळाचा ओढा परिसरातील भाजी विक्रेत्यांना शाहूपुरी पोलिस तसेच वाहतूक विभागाने यापूर्वी समज दिली आहे. मात्र, काही दिवस परिस्थिती नियंत्रणात राहते आणि त्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी विक्रेत्यांची गर्दी होते. तांदूळ आळी तसेच नो- हॉकर्स झोन असलेल्या मंगळवार तळे रस्त्यालगतचा परिसरही आता पथविक्रेत्यांसाठी जणू हक्काचे स्थान बनला आहे.
सायंकाळी सहानंतर या चौकात वाहतुकीचा जीवघेणा खेळ सुरू होतो. तांदूळ आळी परिसरात राजवाडा परिसरातील चार प्रमुख रस्ते एकत्र येतात. नगर वाचनालयाजवळील कोपऱ्यावर रिक्षा, भाजीविक्रेते आणि टेम्पो यांची प्रचंड गर्दी होत असल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांचीही कोंडी होते. रस्ता नेमका वाहनांसाठी आहे की मंडईसाठी, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.
पोवई नाका, मार्केट यार्डची समस्या कायम
पोवई नाका भाजी मंडई तसेच मार्केट यार्ड परिसरात सकाळी ११ वाजेपर्यंत (कधी दिवसभरही) भरणारी भाजी मंडई बस स्थानकाकडे ये- जा करणाऱ्या वाहनांसाठी मोठा अडथळा ठरत आहे. या समस्येवर अनेकदा बैठका, सूचना आणि उपाययोजनांचे चर्वितचर्वण झाले. मात्र, प्रत्यक्षात परिस्थितीत अपेक्षित बदल झालेला नाही. मार्केट यार्ड परिसरातील विक्रेत्यांकडून नियमांचे पालन होत नसल्याने वाहतुकीचा प्रश्न कायम आहे. नियम आहेत, प्रशासन आहे, कारवाईची यंत्रणा आहे.
नगराध्यक्षांच्या बैठकीनंतर अंमलबजावणीची प्रतीक्षा
शहर वाहतूक निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने आणि नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी नुकतीच वाहतूक नियोजनासंदर्भात बैठक घेऊन प्रस्तावित आराखड्याच्या अंमलबजावणीचे धोरण स्वीकारले आहे. शहरात टप्प्याटप्प्याने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना या आराखड्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.






