Satara News : एसटी न्हाय म्हणून त्याने धरली चालत घराची वाट… निकमवाडीच्या तरूणाकडून निषेधाचे अनोखे आंदोलन

– प्रशांत जाधव
सातारा : लोकशाही असल्याने आपल्या देशात आंदोलनाचे प्रत्येकाला स्वातंत्र्य असल्याने आजवर आपण अनेक आंदोलने,उपोषणे पाहिली असतील त्यातली काही सामाजिक तर काही वैयक्तीक अडचणींसाठी केलेली. परंतु वाई तालुक्यातील निकमवाडी गावचे मुंबईस्थित तरूण उद्योजक जयवंत निकम यांनी एसटी बसेस वेळेत येत नसल्याने शालेय विद्यार्थ्यांची व नागरिकांची होत असलेली ससेहोलपट पाहून आज (दि.11) सातार्यातील एसटीच्या अधिकार्यांना याबाबत जाब विचारला. मात्र, पदरी निराशा पडल्यामुळे संतापलेल्या निकम यांनी थेट घराची वाट धरून चालत प्रवासाला सुरूवात केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, निकम हे वाई तालुक्यातील निकमवाडी गावचे रहिवाशी असून मुंबईला व्यवसाय करत आहेत. तरीही गाव, भाग आणि येथील लोकांसोबत असलेली त्यांची नाळ न तुटलेली. त्यामुळे नेहमीच ते भागातील लोकांच्या समस्या घेवून आवाज उठवत आले आहेत. अनेकदा पदरमोड करून त्यांनी सामाजिक कामे केल्याचे देखील अनेकांकडून सांगण्यात येते. सामाजिक कामात अग्रेसर असलेले निकम सोशल माध्यमांवरून देखील व्यवस्थेला जाब विचारत आले आहेत.
मात्र, आज यापैकी काहीच न करता निकम यांनी सातारा येथील एसटीच्या मुख्य कार्यालयात जावून ग्रामीण भागात जाणार्या तसेच सातारा ते मुंबई जाणार्या बसेस वेळेत येत नसल्याबाबत अधिकार्यांना जाब विचारला. अधिकार्यांनी दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्याने एसटी प्रशासनाचा निषेध म्हणून,
त्यांनी सातारा ते निकमवाडी हा प्रवास चालत जाण्याचा निर्धार करून थेट निकमवाडीची वाट धरली. सुमारे 25 किलोमीटर पायी चालत जाण्याचा निर्धार केलेल्या निकम यांच्या आंदोलनाकडे रस्त्याने ये-जा करणारे नागरिक कौतुक करत आहेत. अनेकांनी एसटी प्रशासनाबाबत संताप व्यक्त केला आहे.
सातारा आगाराला शासनाकडून पाहिजे त्या प्रमाणात बसेस दिल्या जात नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागात व मुंबई जाणार्या अनेक फेर्या बंद करण्यात आलेल्या आहेत. परिणामी प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याने मी आज सातारा ते निकमवाडी हा 25 कि.मी प्रवास चालत निघालो आहे. त्यानंतर सातारा ते मुंबई हा प्रवास देखील मी चालत जाणार आहे.





