Satara News : घरकुल बांधायला १५ दिवसांची मुदत, अन्यथा पैसे परत करा ; प्रशासनाचा ३०३ लाभार्थ्यांना इशारा

प्रभात वृत्तसेवा
सातारा – घरकूल बांधकामासाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत पहिला हप्ता जमा केला आहे. परंतु, काही लाभार्थ्यांनी घरकुले उभारण्यास सुरुवातही केलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ३०३ लाभार्थ्यांना प्रशासनामार्फत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. येत्या १५ दिवसांत घरकूल बांधकामाला सुरवात न केल्यास पैसे परत करण्याचा निर्वाणीचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
ग्रामीण विकास यंत्रणेकडून याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.केंद्र व राज्य शासनामार्फत प्रत्येक कुटुंबाला हक्काच्या निवाऱ्याची सोय व्हावी म्हणून घरकूल योजनेचा लाभ दिला जातो. २०१६- १७ ते २०२१- २२ मध्ये घरकुलांच्या विविध योजनांमधून लाभार्थ्यांनी हजारो घरकुलांचा लाभ घेतला. जिल्ह्यात जावळी १, कराड ३०, खंडाळा १५, खटाव ५६, कोरेगाव १८, माण ४०, पाटण ४५, फलटण ५१, सातारा ४४, वाई १३ असे मिळून ३०३ लाभार्थ्यांनी घरकुलाचा पहिला हप्ता घेतल्यानंतरही घरकुले उभारण्याकडे कानाडोळा केला आहे.
या लाभार्थ्यांनी घरकुलासाठी घेतलेल्या पैशाचा वापर इतर कारणासाठी झाला आहे. त्यामुळे त्यांना प्रशासनामार्फत वारंवार घरकुले बांधण्यासाठी लाभार्थ्यांना सूचना देण्यात आल्या. इशारा नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत.संबंधित लाभार्थ्यांना दिलेल्या नोटिसामध्ये मुदतीत बांधकाम करण्याचा इशारा देण्यात आला आहे. बांधकाम न झाल्यास शासकीय रकमेचा गैरवापर केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे किंवा पैसे परत करणे यासारख्या कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. याबाबतची कार्यवाही जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयाकडून करण्यात येत आहे.
“लाभार्थ्यांनी येत्या १५ दिवसांत घरकुलांचे बांधकाम सुरू न केल्यास लाभार्थ्यानी शासनाने दिलेली रक्कम जमा करावी, असे आदेश गटविकास अधिकारी व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना दिले आहेत. लाभार्थींनी घरकुलांची कामे करुन कारवाइ टाळावी.”
– विश्वास सिद (प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा)





