Satara Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी पोलिसांचा ‘अॅक्शन प्लॅन’! ‘हे’ नियम मोडले तर थेट कारवाई; पालकमंत्र्यांचे कडक निर्देश
Satara Ganeshotsav: विसर्जन मिरवणूक, गर्दी नियंत्रण आणि महिला सुरक्षेसाठी सातारा पोलीस प्रशासनाचा 'अॅक्शन प्लॅन' तयार; पालकमंत्र्यांसमोर सादरीकरण.

Satara Ganeshotsav – गणेशोत्सवात कायदा- सुव्यवस्थेला कोणतेही गालबोट लागू नये, यासाठी सातारा पोलिसांनी पूर्ण तयारी केली असून गणेश आगमनापासून विसर्जन मिरवणुकीपर्यंतच्या बंदोबस्ताचा ‘अॅक्शन प्लॅन’ पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासमोर सादर केला. पोलीस प्रशासनाने वाहतूक नियंत्रण, मिरवणूक मार्ग, गर्दीची ठिकाणे, महिला सुरक्षा आणि विसर्जन व्यवस्थेबाबत करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती शिवतेज हॉलमध्ये गणेशोत्सवाच्या तयारीसाठी बोलावलेल्या बैठकीत देण्यात आली.
जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. गौरी विसर्जनानंतरच्या गणेशोत्सवाच्या उर्वरित कालावधीत रोज रात्री गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी महिला व मुली मोठ्या संख्येने घराबाहेर पडतात. या काळात गर्दीच्या ठिकाणी महिला सुरक्षेला विशेष प्राधान्य देण्याच्या सूचना देसाई यांनी केल्या.
संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त, वाहतूक नियमन आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने पोलिसांनी आखलेल्या उपाययोजनांचा बैठकीत आढावा घेण्यात आला. गणेश आगमन व विसर्जन मिरवणुकांदरम्यान ध्वनीप्रदूषणाचा प्रश्नही प्रशासनाने गांभीर्याने घेतला आहे. डॉल्बीच्या वापरावर सरसकट बंदी नसली तरी निर्धारित ध्वनीमर्यादा ओलांडल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला.
नागरिकांच्या डोळ्यांना त्रास अथवा इजा होण्याची शक्यता असलेल्या लेझर लाईटचा वापर टाळण्याच्या सूचना गणेश मंडळांना देण्यात आल्या. सातारा शहरातील विसर्जनाच्या दिवशी होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी लक्षात घेऊन कृत्रिम विसर्जन तळ्याचे नियोजन करण्याच्या सूचना नगरपालिकेला देण्यात आल्या. विसर्जन मार्गावरील वाहतूक, मिरवणुकांची वेळ, गर्दी नियंत्रण आणि आवश्यक पोलीस बंदोबस्त यांचा समन्वय साधण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
‘दिलेल्या शब्दापासून सरकार मागे हटणार नाही’
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरही शंभूराज देसाई यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजाला आरक्षण देताना अन्य कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची दक्षता घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा आरक्षणाच्या दिलेल्या शब्दापासून सरकार मागे हटणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात आढळलेल्या सुमारे ५८ लाख मराठा- कुणबी नोंदींच्या याद्या संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रात प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दाखले देताना स्थानिक चौकशी, वंशावळ जुळविणे आणि कागदपत्रांची आवश्यक पडताळणी केली जाणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठका सातत्याने सुरू असून कागदपत्रे आणि विभागनिहाय कामकाजाचा नियमित आढावा घेतला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मनोज जरांगे-पाटील यांनी प्रकृतीची काळजी घेत आवश्यक उपचार घ्यावेत, असे आवाहनही देसाई यांनी केले.






