Garbage issue Satara: ‘स्वच्छ सातारा’ फक्त कागदावरच? बसस्थानकासमोर घाणीचे साम्राज्य; कर्मचारी असूनही स्वच्छतेचा बोजवारा
Garbage issue Satara: राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या प्रवाशांचे कचऱ्याच्या ढिगाऱ्याने स्वागत; सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाचे स्वच्छता नियोजन ढेपाळले.

Garbage issue Satara – जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या सातारा शहराच्या मध्यवर्ती बसस्थानकासमोर रोज साचणारा कचरा पाहिल्यानंतर ही कचरा टाकायची जागा आहे का? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. राज्याच्या कानाकोपर्यातून सातार्यात येणार्या प्रवाशांचे स्वागत कचर्याच्या ढिगार्याने होत असेल, तर ‘स्वच्छ सातारा’ची नेमकी प्रतिमा कोणती, असा सवाल उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे हे एखाद्या दिवसाचे दृश्य नसून रोजचाच कचर्याचा बाजार भरत असल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाच्या स्वच्छता नियोजनाचा पुरता बोजवारा उडाल्याचे विदारक चित्र समोर येत आहे. एकीकडे पालिकेकडे 280 सफाई कामगारांचा आकृतीबंध, त्याशिवाय कंत्राटी कर्मचारी आणि घराघरातून कचरा संकलनासाठी घंटागाड्यांची व्यवस्था आहे.
सीसीटीव्ही कशासाठी? कारवाई कुठे?
बसस्थानक परिसरात सीसीटीव्ही कॅमेर्यांची कमतरता नाही. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणारे नागरिक कॅमेर्यात कैद होत असतील, तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यास पालिकेला अडचण काय? कॅमेरे फक्त शोभेसाठी की नियम मोडणार्यांना पकडण्यासाठी? कचरा टाकणार्यांवर कारवाईची भीतीच नसेल तर सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता कशी टिकणार?
नागरिकांनी कचरा रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी टाकू नये, ही साधी शिस्त आहे. मात्र नियम मोडणार्यांना रोखण्यासाठी पालिकेची यंत्रणा किती सक्रिय आहे, हा त्याहून गंभीर प्रश्न आहे. केवळ जनजागृतीच्या घोषणा करून स्वच्छता अभियान राबत नाही; नियमभंग करणार्यांवर प्रत्यक्ष दंडात्मक कारवाई झाली पाहिजे.
मनुष्यबळ भरपूर, नियोजन कुठे?
280 सफाई कामगार, कंत्राटी कर्मचारी, घंटागाड्या आणि इतर स्वच्छता व्यवस्था असतानाही शहरातील प्रमुख ठिकाणी अस्वच्छता दिसत असेल, तर समस्या साधनांची नसून नियोजनाची आणि नियंत्रणाची आहे, हे पालिकेने मान्य करण्याची वेळ आली आहे. कोणत्या भागात किती कर्मचारी? कोणत्या वेळी कचरा उचलला जाणार? कचरा साचला तर जबाबदार कोण? या प्रश्नांची स्पष्ट उत्तरदायित्वाची साखळी असणे आवश्यक आहे.
आरोग्य सभापती धनंजय जांभळे यांच्यासारखे धडाकेबाज पदाधिकारी असतानाही आरोग्य विभागाच्या कामकाजाबाबत तक्रारी येत असतील, तर या तक्रारींची केवळ दखल न घेता मुळापर्यंत जाऊन झाडाझडती घेण्याची गरज आहे. सभापतींच्या आक्रमक कार्यपद्धतीला प्रशासनाच्या नियोजनाची आणि अधिकार्यांच्या प्रभावी अंमलबजावणीची जोड मिळाली, तरच त्याचा परिणाम शहराच्या रस्त्यावर दिसेल.
सातार्याचे दर्शन कचर्यातून का?
मध्यवर्ती बसस्थानक म्हणजे शहराची पहिली ओळख. राज्यभरातून येणार्या प्रवाशांना याच ठिकाणी कचरा आणि दुर्गंधी दिसत असेल, तर सातार्याची पर्यटननगरी, ऐतिहासिक नगरी आणि स्वच्छ शहर अशी ओळख आपण कोणत्या तोंडाने सांगणार? शहर घाण करणारा नागरिक दोषी आहेच; पण तो कचरा उचलण्याची यंत्रणा कुचकामी ठरत असेल, तर पालिकाही जबाबदारीपासून पळू शकत नाही.






