Sanjay Raut : राम मंदिराचे कॉर्पोरायझेशन सुरू झाले आहे; संजय राऊत यांची टीका
अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) नियुक्त करून मंदिराचे कॉर्पोरायझेशन (व्यावसायिक स्वरूप देणे) सुरू झाले आहे, असे विधान शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गुरुवारी केले.

Sanjay Raut : अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) नियुक्त करून मंदिराचे कॉर्पोरायझेशन (व्यावसायिक स्वरूप देणे) सुरू झाले आहे, असे विधान शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गुरुवारी केले.
देणगीचोरीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या मोठ्या फेरबदलाचा भाग म्हणून, राम मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने बुधवारी निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची पहिले सीईओ म्हणून आणि माजी खजिनदार गोविंद देव गिरी यांची नवीन सरचिटणीस म्हणून नियुक्ती केली. राम मंदिरासाठी पहिल्यांदाच सीईओची (Sanjay Raut) नियुक्ती झाली आहे.
याचा अर्थ मंदिराचे कॉर्पोरायझेशन झाले आहे. जिथे व्यवसाय असतो, तिथेच सीईओ, व्यवस्थापकीय संचालक आणि संचालक असतात, असा दावा राऊत यांनी केला. राऊत यांनी जीडीपीच्या आकडेवारीवरून भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारवरही टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ७.८ टक्के जीडीपी विकासदरासाठी जनतेचे कौतुक केले आणि युद्ध, अस्थिरता व पुरवठा साखळीतील व्यत्यय असूनही ही कामगिरी साध्य झाल्याचे नमूद केले. मात्र, या आकडेवारीवर प्रतिक्रिया देताना माजी वित्त सचिव सुभाष गर्ग यांनी म्हटले होते की, जर गेल्या वर्षीचा जीडीपी अंदाजे ८६ लाख कोटी रुपयांवरून ८० लाख कोटी रुपयांपर्यंत कमी (सुधारित) केला नसता, तर चालू किमतींनुसार जीडीपी वाढीचा दर सुमारे २.६ टक्के राहिला असता.
यावर भाष्य करताना राऊत यांनी दावा केला की, देशाला अंधारात ठेवले जात आहे. जर जीडीपी ७.८ टक्के असेल, तर सरकार ८५ कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य का देत आहे आणि १५०० रुपये देऊन लाडकी बहीण योजनेतील महिलांना गुलाम का बनवत आहे, असा सवाल राऊत (Sanjay Raut) यांनी उपस्थित केला. पंतप्रधानांनी आपले सल्लागार बदलले पाहिजेत, असेही राऊत म्हणाले.






