Satara Crime News : सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या एका तरुणीने गुरुवारी (20 ऑक्टोबर) रात्री शहरातील एका नामांकित हॉटेलच्या बंद खोलीत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भाऊबीजेच्या सणाच्या रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने संपूर्ण सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मृत तरुणी मूळची बीड जिल्ह्यातील असून, गेल्या दोन वर्षांपासून फलटण येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत होती. या प्रकरणाला आता गंभीर वळण लागले असून, तिच्यावर पोलिस आणि राजकीय दबाव होता, तसेच पोलिस अधिकाऱ्याने अत्याचार केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. जिद्दीने वैद्यकीय शिक्षण पूर्ण मृत डॉक्टर तरुणीने जिद्दीने वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले होते. ती मूळ बीड जिल्ह्यातील रहिवासी होती आणि तिचे आई-वडील शेतकरी आहेत. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही तिने दहावीपर्यंत बीड येथील शाळेत शिक्षण घेतले आणि नंतर जळगावच्या वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. तिच्या चुलत्यांचे कुटुंब उच्चशिक्षित असल्याने तिला शिक्षणाचे महत्त्व पटले होते. तिची पहिली नियुक्ती महाबळेश्वर येथे सहा महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने झाली होती. त्यानंतर दीड वर्षांपूर्वी ती फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाली. ती अविवाहित होती आणि पुढील आठवड्यात सुट्टी घेऊन मूळ गावी जाणार होती. तणावामुळे मला माझे आयुष्य संपवावे लागेल या प्रकरणात मृत तरुणीच्या काकांनी आणि आतेभावाने गंभीर आरोप केले आहेत. काकांच्या मते, तिच्यावर शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी दबाव टाकला जात होता. यामुळे ती प्रचंड मानसिक तणावाखाली होती. तिने आपल्या वरिष्ठांना आणि नातेवाईकांना वारंवार सांगितले होते की, “तणावामुळे मला माझे आयुष्य संपवावे लागेल.” तिच्या आतेभावाने असा दावा केला आहे की, फलटण भागातील खासदारांचे दोन पीए तिला फोन करून दबाव टाकत होते. याशिवाय, पोलिस निरीक्षक गोपाल बदने आणि महाडिक नावाच्या व्यक्तींचाही तिने तक्रारीत उल्लेख केला होता. तिने दोन महिन्यांपूर्वी पोलिसांना एक पत्र लिहून या दबावाची माहिती दिली होती, परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. तसेच, तिने मागच्या महिन्यात माहितीच्या अधिकारात अर्ज केला होता, परंतु त्याचे उत्तरही तिला मिळाले नाही. सुसाईड नोटमधील धक्कादायक खुलासे मृत तरुणीच्या हातावर पेनाने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये गंभीर मजकूर आढळला आहे. त्यात तिने लिहिले आहे, “पोलिस निरीक्षक गोपाल बदने याने माझ्यावर चार वेळा बलात्कार केला. प्रशांत बनकर याने मला मानसिक छळ केला.” या नोटमुळे या प्रकरणाची गंभीरता आणखी वाढली आहे. तिच्या आतेभावाने सांगितले की, गेल्या वर्षभरापासून तिच्यावर पोलिस आणि राजकीय दबाव वाढला होता. पोस्टमॉर्टम अहवाल त्यांच्या सांगण्यानुसार तयार करावे लागत होते, तसेच रुग्णालयात न आणता रुग्णांना फिटनेस किंवा अनफिटनेस प्रमाणपत्रे देण्याचा दबाव तिच्यावर होता. या सततच्या तणावामुळे ती मानसिकरित्या खचली होती. आरोग्य अन् पोलिस यंत्रणेतील गंभीर वास्तव समोर या प्रकरणातून आरोग्य आणि पोलिस यंत्रणेतील गंभीर वास्तव समोर आले आहे. मृत तरुणीने आपल्या वरिष्ठांना तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप आहे. तिने लिहिलेल्या पत्रात खासदाराच्या नावाचा थेट उल्लेख नसला, तरी त्यांच्या पीए आणि पोलिस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. तिच्या कुटुंबीयांनी सांगितले की, तिने सर्वतोपरी प्रयत्न करूनही तिला न्याय मिळाला नाही, त्यामुळे तिने टोकाचे पाऊल उचलले. मुख्यमंत्र्याचे तातडीचे कारवाईचे आदेश या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यांनी सातारा जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून माहिती घेतली असून, संबंधित पोलिस अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. सध्या जिल्हा पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे.