‘हर हर महादेव’, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटावर संभाजीराजेंचा आक्षेप; निर्मात्यांना दिला इशारा
पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चित्रपट निघत आहेत. ही चांगली गोष्ट आहे, मात्र काही ऐतिहासिक चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड केली जात आहे तसेच या चित्रपटांमध्ये इतिहासाचा विपर्यास करण्यात येत आहे. हे चुकीचे आहे. मी इतिहासाची तोडमोड होऊ देणार नाही, असे म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी काही ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मात्यांवर इतिहासाची तोडमोड केल्याचा आरोप केला आहे.
नुकताच ‘हर हर महादेव’ हा चित्रपट प्रसिद्ध झाला आहे. तसेच ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून त्यातील काही पोस्टर रिलिज करण्यात आले आहेत. यावर संभाजीराजे यांनी आक्षेप घेतला आहे.
संभाजीराजे म्हणाले, ‘हर हर महादेव’ चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे. या चित्रपटात इतिहासाचा विपर्यास करण्यात आला आहे. हे असे चित्रपट आपण लोकांपुढे घेऊन जायचे? सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावानं, आपल्याला आधिकार दिले आहेत, म्हणून आपण चित्रपटात काही पण दाखवाचं का? सिनेमॅटिक लिबर्टी असली तरी इतिहासाचा गाभा सोडून कसे काय हे लोक चित्रपटाची निर्मिती करत आहेत?’ असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. तसेच इतिहासाची तोडमोड करून चित्रपटांची निर्मिती केल्यास गाठ माझ्याशी आहे, असा इशाराही छत्रपती संभाजीराजेंनी चित्रपट निर्मात्यांना दिला आहे. तसेच सेन्साॅर बोर्डात ऐतिहासिक चित्रपटांसाठी समिती असावी, अशी मागणीही संभाजीराजे यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे.
यावेळी संभाजीराजेंनी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटातील कलाकारांचा एक फोटो दाखवत ‘हे मावळ्यांचे पोषाख बघा, हे मावळे आहेत का?’ असा सवाल उपस्थित केला. महाराजांकडे आपण अस्मिता आणि प्रेरणा म्हणून बघतो त्यामुळे त्यांच्या चित्रपटात इतिहासाची तोडफोड होऊ नये, असे मत त्यांनी मांडले. यावेळी त्यांनी पेंढारकर यांनी छान चित्रपट बनवले असा उल्लेख केला. शिवाजी महाराज यांचा असा चित्रपट बनला पाहिजे की अख्खं जग बघेल, असे संभाजीराजे म्हणाले.





